मुंबई : पनवेलमध्ये आज भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदावरून भाजपमधील खदखद समोर आली आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला. या निर्णयामुळे आपल्याला दुःख झाले. परंतु, एवढे मोठे दुःख पचवून आपण सर्व जण पुढे गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यात सत्ता बदल होण्याची गरज होती. राज्यात सत्ता बदल झालाही. सत्ता बदल होत असताना योग्य मेसेज देईल अशा व्यक्तीची गरज होती. परंतु, असे असताना देखील आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. पण, केंद्रीय नेतृत्वाचा आदेश फडणवीस यांनी मान्य करुन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले.