नवी दिल्ली – बोर्डाच्या परीक्षांचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने आगामी काळात बोर्डाच्या परीक्षांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे आकलन एका परीक्षेतून होणार नसून, वर्षभराच्या अभ्यासाच्या आधारावर त्यांचा निकाल निश्चित होणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाची परीक्षा दोन भागात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे मॉडेल विकसित करण्यात येत आहे. परीक्षांमध्ये विचार करायला लावणारे प्रश्न असतील. त्यामुळे आपोआपच घोकमपट्टीला फाटा मिळणार आहे.
बदलाची मोहीम
बोर्डाच्या परीक्षांसह इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबतही असाच विचार सुरू आहे. विद्यापीठांसह वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षांमध्ये तणावाचे वातावरण, निकराची प्रतिस्पर्धा पाहून केंद्रीय शिक्षण मंत्रालय असा बदल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये परीक्षांबाबत सुधारणा करण्याच्या शिफारशी यापूर्वीच करण्यात आल्या आहेत.
विचार करायला लावणारे प्रश्न अधिक
कोचिंग क्लास आणि रट्टा मारून परीक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांऐवजी विचार करणारे चांगले विद्यार्थी पुढे यावेत यासाठी काही बदल करणे अपेक्षित मानले जात आहे. वर्गामध्ये नियमित अभ्यास करणारे विद्यार्थीच उत्तीर्ण होतील अशाच पद्धतीने बोर्डाच्या परीक्षांचा आराखडा तयार केला जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत परीक्षेचा अभ्याक्रम लहान लहान भागात आयोजित केला जाणार आहे.
सीबीएसईपासून सुरुवात
या बदलाच्या मोहिमेची अंमलबजावणी सीबीएसईच्या २०२१-२२ मध्ये होणार्या बोर्डाच्या परीक्षेत करण्यात येणार आहे. त्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन भागात घेण्यात येणार आहे.
निम्म्या अभ्यासक्रमाची परीक्षा पहिल्या भागात आणि उर्वरित अभ्यासक्रमाची परीक्षा दुसर्या भागात होणार आहे. दोन्ही परीक्षांचे मिळून निकाल तयार करण्यात येणार आहे. सीबीएसईसह राज्यांच्या शिक्षण बोर्डालाही अशाच पद्धतीने परीक्षा घेण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय राज्यांच्या संपर्कात आहे.
ही प्रथा होणार हद्दपार
शिक्षण मंत्रालयाचे हे पाऊल फक्त बोर्डांच्या परीक्षांसाठी मर्यादित नसले. इतर वर्गांच्या परीक्षांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक धडा पूर्ण झाल्यानंतर एक चाचणी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा विद्यार्थ्यांचे ज्ञान पडताळण्यासाठी घेतली जाईल. याच आधारावर परीक्षेचा अंतिम निकाल तयार केला जाईल.
२०२५ पर्यंत बोर्ड परीक्षा अशा
बोर्डांच्या परीक्षांमध्ये विचार करायला लावणारे प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची योग्यता आणि त्यांची क्षमता तपासली जाणार आहे. २०२१-२२ च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये बहुपर्यायी (एमसीक्यू), संक्षिप्त उत्तरे आणि सविस्तर उत्तरे लिहिण्याचे प्रश्न विचारले जातील. परीक्षेत असे २० टक्के प्रश्न विचारले जातील. २०२५ पर्यंत बोर्डाच्या परीक्षांमध्ये शंभर टक्के प्रश्न विचाराच्या आधारांवरच असतील.