मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ब्रह्माकुमारीज् तर्फे आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे`कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या गुरुवारी (२० जानेवारी) सकाळी १० वाजता हा समारंभ होणार आहे,
सन २०२२ हे वर्ष भारत सरकार संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करीत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ब्रह्माकुमारीज् संस्थेने `स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे` या विषयावर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. ज्यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक आणि पर्यंटन मंत्रालयाच्या सहकार्याने ब्रह्माकुमारीज् सेवा केंद्रामार्फत संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आणि उपक्रमाांचे आयोजन करण्यात येईल.
ब्रह्माकुमारीज् देशव्यापी कार्यक्रमाचे राष्ट्रीय उद्घाटन गुरुवार, २० जानेवारी सकाळी १० वाजता संस्थेचे मुख्यालय असलेल्या शांतीवन (माउंट आबू) येथील विशाल डायमंड सभागृहात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने होणाऱ्या या उदघाटन समारंभाला सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी आणि अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित असतील. कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारीज् महासचिव बी.के. निर्वेरभाई आणि कार्यकारी सचिव बी.के. मृत्युंजयभाई यांनी केले आहे.
उपरोक्त कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे. देशभरातील ब्रह्माकुमारीज् सेवा केंद्रांमध्ये हा समारंभ मोठ्या पडद्यावर लाखो साधक पाहू शकतील. महाराष्ट्रात ब्रह्माकुमारीज् संयुक्त मुख्य प्रशासिका ब्रह्माकुमारी संतोषदीदीजींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित होतील, असे माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले आहे.
उदघाटन समारंभ ऑनलाईन पाहण्यासाठी लिंक: http://bkinfo.in/amritmahotsav