मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काल जयंती होती. त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही (भाजप नेत्यांनी) वंदन केले. तसे ट्विट आणि सोशल मिडियात पोस्टही शेअर केल्या. मात्र, राज्यात सत्ताधारी घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या गांधी कुटुंबाने साधे ट्विट तरी केलं का, असा खोचक सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांना उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. यास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करता करता शिवसेना थकून गेली. भाजपच्या सरकारनं अलाहाबादचं प्रयागराज करुनही दाखवलं, असा टोला त्यांनी हाणला.
बाबरीनंतर सीमोल्लंघन केलं असतं तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता असे विधान उद्धव ठाकरे यांनी काल केले. त्यावर हल्लाबोल करीत फडणवीस म्हणाले की, बाबरी प्रकरणानंतर १९९३ मध्ये यूपीत शिवसेनेने १८० उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १७९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. फक्त एकाचेच वाचले होते.
बघा फडणवीस यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेचा व्हिडिओ
LIVE | Media interaction from #Mumbai. #Maharashtra https://t.co/u1MEjxtzEP
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 24, 2022