इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बहुचर्चित संत भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्ट येत्या २८ जानेवारीला निकाल देणार आहे. आरोपी विनायकच्या वतीने अंतिम युक्तिवाद कोर्टात पूर्ण झाला आहे. याआधी अन्य दोन आरोपी पलक आणि शरद यांच्या बाजूने अंतिम युक्तिवाद करण्यात आला आहे. संत भय्यूजी महाराज यांनी त्यांच्याच राहत्या घरी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सेवादार विनायक, शरद आणि पलक यांना अटक केली होती.
सदर आरोपी भैय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्वप्रथम पलकला अटक केली. चौकशीअंती त्याला न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी करण्यात आली. तो जानेवारी २०१९ पासून तुरुंगात आहे. आरोपींनी महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केले होते की नाही हे येत्या २८ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.
अध्यात्मिक संत म्हणून ओळखले जाणारे भैय्यू महाराज यांनी दि. १२ जून २०१८ रोजी आपल्याच कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. महाराजांचे तीन सेवक पलक, विनायक आणि शरद यांनी महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली घटनेच्या सुमारे सहा महिन्यांनंतर, पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तिन्ही आरोपी तुरुंगात आहेत. आरोपी पलकच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता अविनाश सिरपूरकर, आरोपी शरदच्या वतीने अधिवक्ता धर्मेंद्र गुर्जर यांनी अंतिम युक्तिवाद पूर्ण केला आहे. आरोपी विनायकच्या वतीने अधिवक्ता आशिष चौरे आणि इम्रान कुरेशी यांनी अंतिम युक्तिवाद पूर्ण केला. त्याला बळजबरीने या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचे आरोपीच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आले.
भैय्यू महाराजांनी विनायकवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. तरीही त्याने असे का केले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. महाराजांकडे सापडलेला मोबाईल आणि औषधांची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी फिर्यादीकडे पुरेसा वेळ होता, पण तो अद्याप झालेला नाही. फिर्यादी साक्षीदारांनीही आरोपींवर कोणतेही आरोप लावलेले नाहीत. सर्व पक्षकारांचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने निकालासाठी २८ जानेवारीची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.