इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – देशातील पाच राज्यातील निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले असून विशेषतः उत्तर प्रदेशात निवडणुकीचा चांगला जोर दिसून येत आहे. या राज्यात भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्वच विरोधकांनी जणू काही कंबर कसली असून समाजवादी पक्षाच्या पाठीमागे शक्ती उभी करण्याचे अनेक पक्षांनी निर्णय घेतलेला दिसून येत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला आणखी एका राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. तो म्हणजे तृणमूल काँग्रेसने समाजवादी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात उतरणार नाही, असे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरणमय नंदा यांनी सांगितले.
ममता बॅनर्जी अखिलेश यादव यांच्यासोबत व्हर्च्युअल रॅलीही काढणार असल्याचे नंदा यांनी सांगितले.
किरणमय नंदा यांनी ममता बॅनर्जी यांची कालीघाट येथील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले की, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दि. ८ फेब्रुवारी रोजी लखनऊमध्ये समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत ऑनलाईन (आभासी) बैठक घेणार आहेत.
किरणमय नंदा पुढे म्हणाले की, टीएमसी उत्तर प्रदेश निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार नाही, परंतु सपाला पाठिंबा देईल. या आधी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येण्याचे भाजपचे स्वप्न ममता बॅनर्जींच्या पक्षानेच धुळीस मिळवले. हा संपूर्ण विरोधकांसाठी धडा आहे. ममता बॅनर्जी या लखनऊमध्ये एका आभासी सार्वजनिक सभेला संबोधित करतील आणि आमच्या पक्षाला पाठिंबा जाहीर करतील.
नंदा यांनी असेही सांगितले की, फेब्रुवारीमध्ये ममता दीदी या पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी या संसदीय मतदारसंघ भेट देणार आहेत, परंतु त्याबाबतचा अंतिम कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही.विशेष म्हणजे बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांनी घोषणा केली होती की, सपा तेथे कोणताही उमेदवार उभा करणार नाही आणि तृणमूलला पाठिंबा देईल. आता ममतादीदी या त्यावेळच्या मदतीची परतफेड करणार आहेत.
बंगालमधील सत्ताधारी तृणमूलच्या समर्थनार्थ प्रचार करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या प्रमुखांनी राज्यसभा खासदार जया बच्चन यांना पक्षाचे प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. तथापि, तृणमूल उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारात अद्याप उतरली नाही. कारण ममता बॅनर्जी सध्या गोव्यात प्रचारात व्यस्त आहेत. गोव्यात तृणमूल पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, अखिलेश यादव तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर अनेकवेळा दोन्ही नेते विविध मुद्द्यांवरून भाजपवर हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजपला सत्तेवरून खाली खेचणे हा या दोन पक्षांच्या राष्ट्रीय कार्यक्रम आहे.