मुंबई – भारतीय क्रिकेट संघाला सामना जिंकून देण्यात मुख्य प्रशिक्षकाची महत्त्वाची भूमिका मानली जाते माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याप्रमाणेच भारतीय संघ मजबूत करण्यासाठी विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रयत्न सुरू केले असून कोणत्याही क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला यश मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरविले आहे, त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले की, प्रत्येक सामना जिंकणे आणि भविष्यासाठी संघ तयार करणे यात समतोल साधायचा आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी द्रविडने स्पष्ट केले की, संघाच्या प्रशिक्षणासाठी दीर्घकालीन योजना आखावी लागेल. परंतु त्यापुर्वी संघाच्या विजयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तसेच वेगवेगळ्या संघांचे प्रशिक्षक एकाच पद्धतीने निर्णय घेऊ शकत नाहीत. काही कोचिंग तत्त्वे कधीही बदलणार नाहीत, परंतु प्रत्येक संघाची आव्हाने आणि गरजा भिन्न आहेत. त्यामुळे आपण असे म्हणू शकत नाही की, अंडर-१९ स्तरावर जे काही केले गेले ते सर्व येथे देखील केले जाईल.
द्रविड पुढे म्हणाला की, माझ्यासाठी ही खेळाडू शिकण्याची आणि जाणून घेण्याची संधी आहे. सपोर्ट स्टाफ या नात्याने खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे ही माझी जबाबदारी आहे. तसेच द्रविडने सांगितले की, ज्युनियर स्तरावरील अंतिम लक्ष्य हे विजय नसून वरिष्ठ स्तरावर संघाने प्रत्येक सामना जिंकणे अपेक्षित आहे. त्याकरिता समतोल राखणे महत्वाचे आहे. तसेच आम्हाला प्रत्येक सामना जिंकण्याचे ध्येय ठेवले पाहिजे परंतु ध्येयांसाठी खेळाडूंच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.
नूतन प्रशिक्षक राहूल म्हणाला की, जिंकणे महत्त्वाचे आहे परंतु भविष्यासाठी मजबूत संघ तयार करणे देखील डोळ्यांसमोर असेल. दोन्हींचे मिश्रण आवश्यक आहे, आता जिंका आणि भविष्यावर लक्ष ठेवा, असे मी खेळाडूंना सांगितले असून येणाऱ्या मोठ्या स्पर्धांसाठीही तयारी करावी लागेल. भविष्याचा विचार करणे आणि कोणत्याही संघाला प्रशिक्षक करणे हे माझे काम आहे, त्यात बदल होणार नाही.
द्रविडने सांगितले की, वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या संघांचा विचार केला जात नाही, पण सर्व फॉरमॅट खेळणाऱ्या खेळाडूंना योग्य विश्रांती दिली जाईल. भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीलाही टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. इतके जास्त क्रिकेट खेळले जात आहे. त्यामुळे खेळाडूंचे व्यवस्थापन आवश्यक आहे. जसे फुटबॉलमध्येही खेळाडूंना प्रत्येक सामना खेळता येत नाही. त्यामुळे जागतिक क्रिकेटमधील प्रत्येक संघासमोर हे आव्हान आहे आणि आम्हाला कामाचा बोजा सांभाळावा लागेल.