नवी दिल्ली – भारत आणि चीनचे संबंध जगजाहीर आहेत. भारताला कोणत्याही पद्धतीने कोंडीत पकडून कारवाया करणे हा चीनचा गेल्या अनेक वर्षांपासून जणू काही धंदा बनला आहे. काही वेळा उघडपणे तर काही वेळा गुप्तपणे या कारवाया सुरूच असतात. विशेष म्हणजे चिनी लष्कराला या कारवायांसाठी चीन सरकार कडून छुपा पाठिंबा मिळत असतो. विशेषतः अशा घटना भारत-चीन सीमा लगेच या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.
गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चिनी लष्कराच्या संशयास्पद भूमिकेची चौकशी सुरू आहे. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे एक कर्नल, त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर चार रायफल जवान शहीद झाले, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. दोन दहशतवादी गटांनी (पीपल्स लिबरेशन आर्मी आणि मणिपूर नागा पीपल्स फ्रंट) म्यानमार सीमेजवळील मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी संयुक्तपणे स्वीकारली आहे.
गुप्तचर सूत्रांनी सांगितले आहे की, फुटीरतावादी अतिरेकी संघटना असलेल्या पीएलएच्या सदस्यांना म्यानमारच्या छावण्यांमध्ये चिनी सैन्याने प्रशिक्षण दिल्याचा संशय आहे. तसेच त्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्तचर यंत्रणांनी मणिपूर सीमेजवळील छावण्यांचे ड्रोन व्हिडिओ फुटेज ताब्यात घेतले आहेत. या शिबिरांमध्ये चिनी लष्कराचे प्रमुख नेते उपस्थित असल्याची शक्यता आहे. तैवान आणि तिबेटमधील लॉबींशी भारताच्या संबंधांवर चीन नाराज आहे. त्यामुळे चीनी लष्कर ईशान्येकडील भारताविरुद्ध फुटीरतावादी संघटनांना पाठिंबा देण्यास तयार असल्याचे दिसत आहे.
भारतीय एजन्सींना भीती वाटते की, ईशान्येकडील बंडखोर गटांना म्यानमार लष्कराचाही पाठिंबा आहे, त्यांच्या स्वत: च्या लष्करातील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नियमित गस्तीसाठी ते बंडखोरांना वापर करतात. त्यामुळे भारताने अधिकृतपणे म्यानमारला कळवले आहे की, हे बंडखोर गट उर तागा भागात असून त्यांनी अशा संघटनांवर कारवाई करावी.