इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुखाबरोबर दुःखही येते हे खरेच आहे, याची प्रचितीची एका गरीब रिक्षावाल्याला सध्या येत आहे. केरळमधील हा तरूण आपली आर्थिक परिस्थितीची बेताची असल्याने रिक्षा चालवून संसार चालवत होता. परंतु एक दिवस त्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि त्याचे नशीबच पालटले, त्याला चक्क १५ कोटी रुपये मिळणार असल्याने खूप आनंद झाला, परंतु त्याच्याकडून अनेकांच्या पैशांची मदत मिळण्याच्या अपेक्षा वाढल्याने त्याचा आनंद कमी होऊन डोक्याला मोठा ताप झाला आहे, या त्रासाला कंटाळून त्याने घर देखील बदलले आहे.
असे म्हणतात की एखाद्याचे नशीब उघडले की, त्याला कोणी अडवू शकत नाही. परंतु काहींच्या नशिबाने साथ दिली तरी त्यात अडचणी देखील येतात, असे म्हटले जाते. श्रीवराहम गावातील अनुप नावाच्या रिक्षावाल्याच्या बाबतीतही सध्या असेच घडत आहे. दिवसभर रिक्षा चालवूनही त्यात परवडत नसल्याने आणखी पैसे मिळावे म्हणून त्याने परदेशात जाऊन काहीतरी कामधंदा शोधण्याचाही निर्णय घेतला होता. इतकेच नव्हे तर परदेशात जाण्यासाठी त्याने सुमारे ३ लाख रुपयांचे कर्ज घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
त्याच काळात केरळमधील प्रसिद्ध ओणमचा सण आला आणि अनुपने एक लॉटरी तिकीट खरेदी केले. त्यात त्याचे नशीबच उघडले अन् त्याला चक्क २५ कोटी रुपयांची लॉटरी लागली यामधून सुमारे ११ कोटी रुपये कर वजा जाता, त्याच्या हातात सुमारे १४ कोटी रुपयांची रक्कम पडणार होती. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. परंतु त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही, याउलट त्याच्या डोक्याला मोठा ताप झाला आहे.
कारण त्याला इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी लागताच घरची मंडळी आणि जवळचे नातेवाईक यांच्या अपेक्षा वाढल्या, त्यांचे ठीक आहे, परंतु शेजारी पाजारी दूरवरची मंडळी तसेच ज्या नागरिकांना तो ओळखत देखील नाही, ते देखील त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी गर्दी करू लागले. कोणाला देवस्थानसाठी देणगी हवी तर कोणाला सन उत्सवासाठी मदत हवी तर काही जणांना आजारपणासह खासगी कामासाठी देखील मदत हवी आहे.
खरे म्हणजे अजून अनुपच्या हातात लॉटरीची रक्कम पडली नाही, त्याबद्दल त्याने सर्वांना सांगितले, पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. सकाळ झाली की, त्याच्या दारात पैसे मागण्यांची गर्दी होते, त्यामुळे त्याने अखेर घरही बदलले आहे, परंतु त्याचा ताप काही कमी झालेला नाही. या संदर्भात त्याने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे, मला इतक्या रकमेची लॉटरी लागली नसती तर बरे झाले असते, त्याऐवजी दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरचे लॉटरी लागून कमी पैसे मिळाले असते तरी चालले असते, असे तो म्हणतो. बिचाऱ्या या रिक्षावाल्याच्या अपेक्षा फार नाही, परंतु त्याच्याविषयी इतरांच्या अपेक्षा वाढल्याने त्याची झोप उडाली आहे, असे दिसून येते.
Auto Driver 25 Crore Lottery Win But