मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराजवळ महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे अतिभव्य पुनर्निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत श्रीराम जन्मस्थळी दर्शनासाठी भाविक फार मोठ्या संख्येने जात असतात. त्यांच्या निवासासाठी या मंदिराजवळ भक्तनिवासाची/अतिथी सदनाची उभारणी महाराष्ट्र सरकारने केल्यास, सर्वांच्यादृष्टीने ते अत्यंत सोयीचे होईल. त्यादृष्टीने आपण यासंदर्भात पुढाकार घेऊन उत्तरप्रदेश सरकारकडे भूखंडाची मागणी करावी. तेथे हे भक्तनिवास/अतिथी सदन भाविकांच्या सोयीसाठी उभारले जावे, समस्त श्रीराम भक्तांच्यावतीने ही विनंती आपणाकडे करीत आहे, असे ॲड. नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्रातून अयोध्येत जाणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे भक्त निवास उभारले जावे, ज्यामुळे सर्व भाविकांना निवास व अन्य सुविधा उपलब्ध करुन देता येतील. कृपया यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने व्हावी, अशी अपेक्षा पत्रात त्यांनी व्यक्त केली आहे.
Assembly Speaker Narvekar letter to CM Shinde