मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिवसेंदिवस चांगलीच रंगत येत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने माजी नगरसेवक मुजरी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटामुळे या निवडणुकीत मोठी चुरस वाढली आहे. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, भाजपने त्यांचा उमेदवार मागे घेऊन ठाकरे गटाच्या ऋतुजा यांना विजयी करावे. या पत्रावर आता फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
मुंबईतील क्रेडाईच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर फडणवीस म्हणाले की, आज सकाळीच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. भाजपच्या उमेदवाराला या पोटनिवडणुकीत पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी राज यांना केली. या भेटीनंतर राज यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात राज यांनी म्हटले आहे की, कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की, भाजपने ही निवडणूक लढवू नये. आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा या आमदार होतील हे पहावे. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्योत निवडणूक न लढविण्याचं धोरण स्विकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं, असे राज यांनी पत्रात नमूद केले आहे.
यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, भाजप उमेदवाराच्या माघारीबाबत मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. यासंदर्भात मला पक्षश्रेष्ठींसह आमचे सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागले. राज यांच्या भावना लक्षात घेऊन नक्कीच आम्ही यावर सकारात्मक चर्चा करु. आणि योग्य तो निर्णय घेऊ, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
बघा, फडणवीस यांची संपूर्ण प्रतिक्रीया
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/F5wQkcunIB
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) October 16, 2022
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम..
निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार १४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करणे, १५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, १७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर ३ नोव्हेंबर रोजी मतदान, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मतदारांची ओळख पटावी म्हणून नेमकी कोणती ओळखपत्रे लागतील, त्याची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
Andheri Bypoll Election BJP Candidate Devendra Fadanvis Reaction