मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राज्यसभा निवडणुकीत 3 जागा जिंकून सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीला हादरा देणारा भाजप आता विधान परिषद निवडणुकीसाठीही असेच काहीसे डावपेच आखत आहे. विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी निवडणूक होत असून भाजपने 5 उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा डावपेचांचा खेळ रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ‘या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आमची सूचना होती. सत्ताधारी पक्षात कमालीची अस्वस्थता असून आम्ही 5 जागांवर लढत आहोत. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नसून आता निवडणूक होणार आहे. त्यांच्यात मोठा संघर्ष असून आम्हाला मते मिळणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वक्तव्याने एकीकडे महायुतीतील संघर्ष समोर आणण्याबरोबरच भाजपची रणनीतीही स्पष्ट केली आहे. खराब व्यवस्थापनामुळे शिवसेनेचे संजय पवार यांना राज्यसभेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केवळ दोन उमेदवार विजयी होण्याची शक्यता असताना भाजपने उत्तम व्यूहरचना करीत तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना विजय प्राप्त करुन दिला आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष आणखी पेटला आहे. त्यातही भाजप आणि शिवसेना यांच्यातील तेढ आणखीनच वाढली आहे.
राज्यसभेत चांगलीच ठेच पोहचल्याने आता शिवसेनेचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांचा विजय निश्चित करावा. म्हणजेच, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी स्वतंत्र डावपेच आखावेत, असे सांगितले आहे. म्हणजेच, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमुळेच राज्यसभेतील शिवसेना उमेदवार पराभूत झाल्याचा निष्कर्ष निघतो आहे.
शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “अपक्षांच्या पाठिंब्यावर कोणतेही समीकरण बिघडू शकते हे स्पष्ट आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्यात 20 जून रोजी 10 जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक गुप्त मतपत्रिकेद्वारे घेतली जाते. अशा स्थितीत या निवडणुकीत क्रॉस वोटिंग आणि घोडोबाजाराची शक्यता बळावली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आघाडीला पुन्हा एकदा झटका बसला, तर ती मोठी चिंतेची बाब ठरणार आहे. एवढेच नाही तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो. आणि हीच बाब भाजपने हेरली आहे.
10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवाराला विजयासाठी 26 ते 27 मतांची आवश्यकता आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल बोलताना शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले की, “राष्ट्रवादीच्या जवळच्या आमदारांनी आमच्या उमेदवाराला मतदान केले नाही. मात्र यानंतरही आपण राष्ट्रवादीकडे बोट दाखवू शकत नाही कारण कदाचित त्या आमदारांना भाजपने काही आश्वासने दिली असतील.
विधानपरिषद निवडणूक निवडणूक बिनविरोध होईल, अशी आमची अपेक्षा होती. पण सत्ताधारी पक्षांना त्यात यश मिळू शकले नाही. काँग्रेसने नकार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. आमचे 5 उमेदवार आहेत. आम्ही सर्व 5 जागा जिंकू,हा पूर्ण विश्वास आहे.#VidhanParishadElection #Maharashtra #BJP pic.twitter.com/PojlyNayBL
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 13, 2022
भाजपने प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे आणि प्रसाद लाड असे ५ उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेने सचिन अहिर आणि आंशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक यांना संधी दिली आहे. याशिवाय काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार जिंकण्यासाठी 8 अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे, परंतु त्यांना विजय मिळवणे कठीण आहे. हीच बाब लक्षात घेऊन भाजपने पाचवा उमेदवार निवडणुकीत उभा केला आहे. आणि आता त्याच्या विजयासाठी डावपेच सुरू झाले आहेत.