मुंबई – तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या बरोबर गैरवर्तन केल्या प्रकरणात १२ विरोधी पक्षातील आमदारांना एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. ओबीसी आरक्षणासंबधी ठराव संमत झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी धक्काबुक्की, शिवीगाळ व राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आशिष शेलार, गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार (बंठी) भांगडिया या १२ आमदारांचा समावेश आहे. या कारवाई नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुस्कटदाबीला बळी पडणार नाही असे सांगत कामकाजावर बहिष्कार टाकला.
दुसरे सत्र चालु झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर संसदीय मंत्री यांनी ठराव केला. एक वर्षासाठी निलंबन करण्याचा ठराव मांडला. निलंबनच्या काळात मुंबई व नागपूर येथे विधानसभेच्या आवारात येण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर हा ठराव संमत झाला. विधानसभेत आज अधिवेशन सुरु झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांतील आमदारांनी एकमेकांना घेरत प्रश्नांची सरबत्ती केली. विरोधकांच्या प्रश्नांवर सत्ताधारी सुध्दा आक्रमक झाले. त्यांनी त्यांना तशाच पध्दतीने उत्तर दिले. तर विरोधकांनी सत्ताधा-यांना घेरण्याचा प्रयत्न केला. एकुणच दोन दिवसाचे हे अधिवेशनाची सुरुवात आज वादळी झाली. पण, पहिल्याच सत्रात आरोप – प्रत्यारोपावरुन धक्काबुक्की व शिवीगाळवर प्रकार घडल्यामुळे दुस-या सत्रात आता त्याचे पडसाद पडले.
सभागृहाबाहेर पत्रकार परिषद
१२ आमदारांची निलंबीत करण्याची कारवाई केल्यानंतर विरोधी पक्षांनी सभागृहाबाहेर पत्रकार परिषद घेत जोरदार महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस , आशिष शेलार यांनी आरोप फेटाळले. शेलार यांनी हे तालिबानी सरकार असल्याचे सुध्दा सांगितले.