गेल्या दीड वर्षापासून आतापर्यंत लहान मुलांना कोरोना विषाणूचा धोका अधिक जाणवला नाही. परंतु आगामी काळात मुलांना संसर्गाचा धोका संभवतो. विषाणूने आणखी रूप बदलले तर मुलांना धोका वाढू शकतो असा अंदाज संशोधकांसह डॉक्टर लावत आहेत. साधारण २ ते ३ टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध ऐका पुढल्या हाका..या उक्तीनुसार धोका ओळखून वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी दिशानिर्देश दिले जाणार आहेत.
कोरोना महामारीचा गंभीर धोका वयस्कांप्रमाणे मुलांना पोहोचू शकतो या गोष्टीला आतापर्यंत केंद्र सरकार फेटाळत आली आहे. परंतु नवे संशोधन आणि विषाणूकडून सतत रूप बदलत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रथमच दिशानिर्देशांवर काम सुरू केले आहे.
मुलांसाठी वेगळे वैद्यकीय दिशानिर्देश तयार होत आहेत. येत्या एक दोन दिवसात सर्व राज्यांना ते पाठविले जाणार आहेत, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. रुग्णालयांमध्ये मुलांसाठी वेगळ्या व्यवस्था वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. सध्या मुलांना संसर्गाचा धोका आहे, परंतु संक्रमित झाल्यानंतर गंभीर रुग्ण खूप कमी आहेत. अधिकांश मुले संक्रमित झाल्यानंतर घरीच बरे होत आहेत, असे डॉ. पॉल म्हणाले.
राष्ट्रीय टास्क फोर्सने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यास, महामारीचा परिणाम आणि नव्या व्हॅरिएंटबाबत चर्चा केली. लहान मुलांना संसर्गाच्या वाढत्या धोक्यापासून वाचविण्यासाठी जिल्हास्तरावर काम करावे लागणार आहे. सतर्कता म्हणून रुग्णालयांमध्ये बालरोग सेवांना वाढविण्यात येणार आहे. रुग्णालयांमध्ये बेड, व्हेंटिलेटर, आयसीयूसह इतर वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. मुलांना संसर्गापासून वाचविण्यासाठी पालकांनी जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अभ्यास सुरू असून त्याचे निष्कर्ष लवकरच येतील. नंतर मुलांचे लसीकरण करण्यात येईल, असे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले.
मुलांना एमआयएस-सी चा धोका
मुलांमध्ये मल्टि सिस्टिम इंफ्लेमेट्री सिंड्रोम (एमआयआस-सी) या आजाराचा धोका वाढला आहे. हा आजार कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पाहायला मिळत आहे. हा पोस्ट कोविडचाच आजार आहे. मुलांचे आरटीपीसीआर निगेटिव्ह येतील परंतु अँटिबॉडीच्या चाचणीत मुले संसर्ग होऊ बरे झाल्याचे लक्षात येईल. अशा मुलांमध्ये दोन ते सहा आठवडे अनेक लक्षणे दिसत आहेत. त्यावर उपचार शक्य आहेत. फक्त संसर्गाचे वेळेवर निदान होणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांना जास्त सतर्कता बाळगावी लागेल.