नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदा महाराष्ट्रात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला त्याचा मोठा फटका बसला आहे. साहजिकच शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने दिवाळी कशी साजरी करावी? असा प्रश्न बळीराजासमोर आहे. त्यातच सोयाबीनचे भाव घसरल्याने सणासुदीला शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसत आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला यंदा अति पावसाचा फटका बसलेला असताना, बाजारात सोयाबीनचे भाव घसरणीला लागल्याने राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक भागात सोयाबीनच्या काढणीची तयारी सुरू आहे. सोयाबीनचे भाव ४ ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल इतके झाले आहेत. गेल्या महिन्यात हे भाव सुमारे ७ हजार रुपये होते, त्यामुळे भावात चक्क २ हजार रुपयांची घसरत झालेली दिसून येते.
साधारणतः दसऱ्यानंतर शेतमालाची बाजारपेठेत आवक सुरू होते. दिवाळीपूर्वी शेतमाल बाजारपेठेत खूप गर्दी व जोश असतो. कारण शेतकऱ्यांना कपडे व अन्य वस्तू खरेदीसाठी पैसा हवा असतो. मात्र, यावर्षी सोयाबीनच्या दरात सतत होणाऱ्या घसरणीमुळे आवक मंदावली आहे. मात्र दिवाळीचा खर्च कसा करावा, या विवंचनेत आता बळीराजा आहे. यंदा खरिपाची सोयाबीन, मका, कपाशी, भाजीपाला आदी पिके सततच्या पावसाने संकटात सापडली आहेत.
आपल्या राज्यात खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे सोयाबीन आणि कापूस आहे. यावर्षी प्रचंड झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस या पिकांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्याने त्यांना यंदा फायदा होणार नाही. त्यातच कमी भाव मिळाल्याने मोठे नुकसान होत आहे. सरकारकडून शेतकरी बांधवांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाल्यास त्यांचे होणारे नुकसान हे भरून निघू शकते, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सोयाबीन हे पीक भारतात सुमारे ७० वर्षापासून मोठ्या प्रमाणात लावले जाते. सध्या लागवड केल्या जाणाऱ्यापिवळ्या दाण्याच्या जातींचा प्रसार सुमारे ४५ वर्षांपूर्वी सुरू झाला. त्यातून सोयाबीन लागवडीची परंपरा निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देणारे नगदी पीक म्हणून पुढे आले. देशात सोयाबीन उत्पादन करण्यात महाराष्ट्र एक क्रमांकाचे राज्य आहे. राज्यातील सुमारे २८ जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते.
मराठवाड्यात लातूर, धाराशिव सारख्या दोन जिल्ह्यात बहुतांश शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतात. लातूरला तर सोयाबीनचे कोठार मानले जाते. येथील शेतकऱ्यांकडे सोयाबीनचे उत्पादन अधिक असून देखील सोयाबीनचे दर ठरवण्यात येथील व्यापारी व बाजारपेठेचा मोठा वाटा आहे. मात्र, सध्या सोयाबीनचे दर घसरत आहेत. त्यात यावर्षी पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यातच मागील काही दिवसात सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत आहे. गेल्या हंगामाच्या शेवटी सोयाबीनचे दर सुमारे ११ हजार रूपये झाले होते. यामुळे यंदाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या होत्या.
दरम्यान, दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी सोयाबीनची बाजारात मोठी आवक सुरू झाली आणि भावात घसरण सुरू झाली. अवघ्या काही दिवसात ७ हजारी पार झालेले सोयाबीन ५ हजारांवर आला आहे. त्यामुळे दिवाळी सण साजरा करण्यासाठी हातात नकदी पैसे पडतील, अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्याला या दर घसरणीचा फटका बसत आहे. तिकडे कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील सोयाबीनचे भाव घसरले आहेत.
आता कॅनडा, अमेरिकेसह (युएसए) दक्षिण अमेरिकेतील काही देशांमधील सोयाबीनचे उत्पादन होते, चीनसारख्या मोठ्या खरेदीदार देशातर्फे होणारी या सोयाबीनची आयात, सोयाबीनची उत्पादकता, सोयाबीन पेंडीची मागणी अशा अनेक घटकांवर सोयाबीनचे भाव जागतिक बाजारात ठरत असतात. सध्या अमेरिकेत सोयाबीनच्या काढणीने वेग घेतला आहे. मात्र तेथे यंदा कमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे चीन आणि इतर देशांची मागणी वाढल्यास सोयाबीनला आधार मिळेल. त्यामुळे दिवाळीनंतर सोयाबीनच्या भावात आणखी घसरण होण्याऐवजी थोडी वाढ होईल, अशी शक्यता शेतमाल बाजारभाव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
Soyabean Farmers Rainfall Rate Tension Loss