सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हयातील मुल्हेर येथील उध्दव महाराज समाधी मंदीरात हजारो वर्षाची परंपरा असलेल्या रासक्रिडा उत्सव रविवारी सायंकाळी साजरा झाला. आश्विन शुध्द पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही रासक्रिडा मथुरे नंतर केवळ मुल्हेर येथेच साजरा होत असते. तीन हजार वर्षापूर्वी बागलाण प्रांतातील राजा मयुरध्वजास भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिव्य चक्षुंनी रासक्रिडाचे दर्शन घडविले होते. तेव्हा पासून मुल्हेर येथे उध्दव महाराज समाधी मंदीराच्या प्रांगणात हा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरु आहे. या ठिकाणी २५ फुट व्यासाच्या चक्राला विश्ष्टि पध्दतीने दोरीने गुंफण्यात येऊन त्यावर केळीच्या पानांनी झाकण्यात आल्यानंतर संपत काळात संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी तेथे जमलेल्या शेकडो भाविकांच्या हातांनी चक्र स्तंभावर चढविले जाते. त्यानंतर त्याला झेंडुच्या फुलांनी सजविण्यात येऊन रात्री श्रीकृष्ण,राधा यांची मिरवणूकी येऊन त्यांना त्या रासचक्रा खाली बसविण्यात येते. संपूर्ण रात्रभर ब्रज भाषेतील १०८ भजनाचे पद म्हटले जाते. कोजागिरीच्या संपूर्ण रात्रभर चालणा-या या उत्सवाची सांगता दुस-या दिवशी सकाळ पर्यंत चालत असते. त्यानंतर सकाळी हे चक्र पुन्हा खाली उतविले जाते. हा सोहळा पाहण्यासाठी नाशिक जिल्हयातूनच नव्हे तर परराज्यातून भाविक मुल्हेर येथे येत असतात.