मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता आणखी एक दणका बसला आहे. पेट्रोल, डिझेल, वीज, भाजीपाल्या पाठोपाठ आता डाळी व कडधान्यांच्या किंंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे साधा वरणभात करतानाही गृहिणींना विचार करावा लागत आहे. किरकोळ बाजारात तूर डाळीचे दर थेट १२५ ते १३५ प्रति किलो झाले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत आता सर्वसामान्यांची चांगलीच परीक्षा राहणार आहे,
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाऊक बाजारात तूरडाळ थेट 115 रुपये किलो झाली आहे. तर किरकोळ बाजारात या किंमतीत 10 ते 20 रुपयांची वाढ झाली असून ग्राहकांना आता एक किलो तुरीसाठी 125 ते 135 रुपये मोजावे लागत आहेत. पावसाळ्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पीके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भाजीपाला आधीच महाग झाला आहे. तर आता डाळी ही महाग झाल्याने घरात खावे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या दरवाढीमुळे किचन बजेट मात्र कोलमडून जाणार आहे.
बाजार समितीत भाजीपाला, कडधान्य आणि डाळींचे दर वाढत असताना तूरडाळी पाठोपाठ मूगडाळीचे दरही वधरले आहेत. मुगाची डाळ ठोक बाजारात 90 ते 100 रुपये किलो या दराने विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो मूगडाळीसाठी ग्राहकांना 120 रुपये मोजावे लागत आहेत. वालाच्या दरातही वाढ झाली आहे. ठोक बाजारात एक किलो वालाचा दर 120 ते 130 रुपये किलोवर गेला आहे.
गेल्या वर्षी तुरीला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने यंदा तुरीच्या पीकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढवला. परिणामी तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. राज्यातील काही बाजारापेठांमध्ये तूर सध्या 100 रुपये किलोच्या आसपास विकली जात आहे. तुरीचे दर वाढल्यामुळे डाळीच्या दरांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यंदा महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत अतिवृष्टी सुरु आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या उत्पादनावर झाला आहे. भाज्यांचे दर ठोक बाजारात 50 ते 100 रुपये किलोच्या आसपास गेले आहेत. त्यामुळे सर्वच भाज्या किरकोळ बाजारात 50 रुपये किलोपेक्षा जास्त दराने ग्राहकांना खरेदी कराव्या लागत आहेत. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
काही साठेधारक आणि व्यापारी बाजारात डाळींचे दर वाढावेत यासाठी डाळींची विक्री थांबवून कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचे काही अहवाल प्राप्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या सूचना दिल्या आहेत. देशातील कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन घेतले जाते. या प्रमुख राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने आणि शेतात ठिकठिकाणी पाणी साचल्याने पेरणी संथ गतीने झाली आहे.
बाजारात तूर डाळींचे घाऊक भाव हे जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढत असल्याचे निदर्शनाला आले आहे. आगामी सणासुदीच्या काळात तूर डाळीच्या किंमतीमध्ये अनावश्यक वाढ होऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकार स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डाळींची उपलब्धता आणि डाळींचे भाव यावर बारकाईने नजर ठेवून आहे. स्थानिक बाजारात डाळींची सर्वाधिक उपलब्धता आपल्या देशात आहे. सध्या सरकारकडे 38 लाख टन एवढी डाळ उपलब्ध आहे. ही शल्लक असलेली डाळ आगामी काळात बाजारात आणली जाईल जेणेकरुन बाजारात डाळींचा अतिरिक्त साठा उपलब्ध होईल.
भाज्यांपाठोपाठ आता डाळ आणि कडधान्यांचे दरही वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी तूरडाळ ठोक बाजारात 80 रुपये किलो या दराने विकली जात होती. मात्र आता एपीएमएसीच्या ठोक बाजारात तूरडाळीचे 100 ते 115 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. डाळींची एकूण उपलब्धता आणि डाळींचे दर यावर केंद्र सरकारची बारीक नजर आहे. कारण साठेधारकांनी तूर डाळीच्या साठ्यांबाबत माहिती उघड करणे अनिवार्य असल्याचे सरकारनं म्हटले आहे. याबाबत, केंद्र सरकारनं राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत. साठ्याबाबतची माहिती साठेधारकांनी ऑनलाईन मॉनिटरिंग पोर्टलवर द्यावी असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
विशेष म्हणजे ग्राहक व्यवहार विभागाने काल, शुक्रवार दि. 12 ऑगस्ट रोजी अत्यावश्यक वस्तू कायदा अन्वये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश जारी केले आहेत. यामध्ये सक्तीने साठेधारकांना तूर डाळींचा साठा उघड करायला सांगितले आहे. त्याचबरोबर तूर डाळींच्या साठ्यावर नजर ठेवायला आणि सत्यता तपासायला सांगितले आहे. राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी साठेधारक कंपन्यांना आपल्या कडच्या डाळीच्या साठ्याविषयीची माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या संकेतस्थळावर प्रत्येक आठवड्याच्या शेवटी उपलब्ध करण्यास सांगावे असा सल्लाही दिला आहे.
तूर डाळ आणि उडीद डाळीच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या सहा आठवड्यांमध्ये तूर डाळ आणि उडीद डाळींच्या तिंमतीत 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मागच्या सहा आठवड्यात डाळींच्या किंमती 97 रुपयावरुन 115 रुपये प्रति किलोवर गेल्या आहेत. देशातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळं पिकांच्या नुकसानीची चिंता वाढली आहे. चालू खरीप हंगामात एकरी क्षेत्रामध्ये घट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
लातूरमध्ये चांगल्या दर्जाच्या तूर डाळीची किंमत सहा आठवड्यांपूर्वी 97 रुपये प्रतिकिलो होती. ती किंमत आता 115 रुपये प्रति किलो झाली आहे. आता आणखीन दहा ते पंधरा रुपयांनी येथील बाजारात तूर डाळीचे भाव वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या पेरणीच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाचा विचार केला तर तूर आणि उडदाच्या क्षेत्रात यंदा घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तूरीखालील क्षेत्र 4.6 टक्क्यांनी कमी झाले आहे, तर उडीदाखालील क्षेत्रात 2 टक्क्यांची घट झाली आहे. प्रमुख तूर उत्पादक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे कल वाढला आहे. शेतकरी सोयाबीनकडे वळल्यामुळं तुरीचा मोठा साठा नाही. यंदा तूर पेरणी देखील कमी झाली असल्याचे महाराष्ट्रातील कडधान्यांचे आयात करणारे व्यापारी हर्षा राय यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे उडीद पिकाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तथापि, आयात वाढण्याची अपेक्षा असल्याने पुरवठ्यावर दबाव येऊ शकत नसल्याची माहिती देखील काही तज्ज्ञांनी सांगितली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये उडीद पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
Pulses Tur Dal Rate Increase in Local Market Inflation
Festive Season