नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमांवर तसेच संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सैन्य दलाचा कडेकोट पहारा आणि बंदोबस्त असतानाही छुप्या पद्धतीने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले अद्यापही सुरूच आहेत. काश्मीरमध्ये बांदिपोरा जिल्ह्यात सादुनारा गावात दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे एका मजुराची गोळी मारुन हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हा मजूर बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील रहिवासी होता. या मजुराची ओळख मोहम्मद अमरेज (वय 19 वर्ष ) अशी पटली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
याबाबत काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी या मजुरावर गोळीबार केला, त्यात मजूर गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. अमरेज काश्मिरात मजुरीच्या कामासाठी आला होता. अमरेजच्या भावाने सांगितले की, आम्ही दोघेही भाऊ झोपलो होतो, त्याचवेळी गोळीबार झाला. भावाने मला उठवले आणि सांगितले की गोळीबार सुरु आहे. मी त्याला सांगितले की हे होतच असते, ‘तू झोप. त्यानंतर काही वेळाने भाऊ बाथरुमला जाण्यासाठी बाहेर गेला, त्यानंतर तो परतलाच नाही. मी त्याला शोधण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मला दिसला. त्यानंतर मी सैन्यदलाशी संपर्क केला त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र रस्त्यात्यातच त्याने प्राण सोडले. ‘
काश्मीरमध्ये गेल्या चार महिन्यात टार्गेट किलिंगमध्ये 11 जणांना प्राण गमवावा लागला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2022 मध्ये टार्गेट किलिंगची आत्तापर्यंत 26 प्रकरणे समोर आली आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारने संसदेत सांगितले आहे की, दहशतवादी काश्मिरात मजुरांना लक्ष्य करीत आहेत. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये 2017 पासून 2022 पर्यंत 28 प्रवासी मजुरांची हत्या केली आहे. यात सर्वाधिक 7 मजूर हे बिहारचे आहेत. त्यासह महाराष्ट्राचील दोन आणि झारखंडच्या एका मजुराची हत्या करण्यात आली आहे. दहशतवादी सध्या हताश मानसिकतेत असल्याने त्यांनी रणनिती बदलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते निरपराध, सामान्य नागरिक, मजूर, अल्पसंख्याक, हत्यारबंद नसलेले पोलीस, राजकीय नेते, महिलांना टार्गेट करीत आहेत.
पाकिस्तानला काश्मिरात अशातंता निर्माम कारयची आहे, त्याच उद्देशातून हे टार्गेट किलिंगचे प्रकार सुरु असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. कलम 370 हटवल्यानंतर काश्मिरात काश्मिरी पंडितांच्या पुवर्वसनात अडथळा निर्माण करायचा, हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येते आहे. कलम 370 हटवण्यात आल्यापासून काश्मिरात हा टार्गेट किलिंगचा प्रकार अधिक फोफावला आहे. यात प्रामुख्याने काश्मिरी पंडित, प्रवासी मजूर तसेच सरकारमध्ये काम करणारे स्थानिक मुस्लीम या सारख्या सॉफ्ट टार्गेटना लक्ष्य करण्यात येते आहे. हे सगळेजण भारताच्या जवळचे आहेत, अशी दहशतवाद्यांची भूमिका आहे.
कलम 370 हटवल्यानंतर बाहेरच्या राज्यातून प्रवासी मजूर काश्मिरात नोकऱ्यांसाठी आणि जमिनी बळकावण्यासाठी येत आहेत, असा अपप्रचार काश्मिरी स्थानिकांमध्ये पसरवण्याचा आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा प्लॅन आहे. दरम्यान, या अपप्रचारातून काश्मिरात पाकिस्तान समर्थकांचा आणि दहशतवादी संघटनांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे. तसेच टार्गेट किलिंगच्या माध्यमातून अजूनही खोऱ्यात दहशतवादी आणि पाकिस्तानचे अस्तित्व आहे, हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही मानण्यात येते आहे. कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवाद्यांच्याविरोधात भारतीय सैन्य दल आणि यंत्रणांनी केलेल्या कारवाईने काश्मिरात दहशतवाद्यांची ताकद कमी झाली.
Again Target Killing in Kashmir Security Forces
Terrorists