डांगसौंदाणे – बागलाण तालुक्यात जंगलांना आग लागण्याचा सिलसिला सुरूच असुन महिनाभरात सुमारे २५० हुन अधिक हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. या आगी कोण लावते आणि का लावल्या जातात ? हा प्रश्न मात्र सर्वसामान्यांसाठी कायमच अनुउत्तरीत राहिला आहे. निसर्ग समृद्ध बागलाणच्या जंगलांना सध्या आगीच्या विळख्याने पुरते घेरले आहे .रोज नवनवीन ठिकाणी डोंगरांना आगी लागत आहेत आणि वनविभाग मात्र या कडे खुशाल डोळे झाक करीत आहे. असाच काहीसा प्रकार पाहवयास मिळतो आहे. गत महिनाभरात लागलेल्या प्रमुख आगीमध्ये पच्चीम भागातील निळवा, आई भिलाई, भांगडा, तिळवण ,सरोवर, डावखल मधील संरक्षित जंगल असलेला डोंगर भाग, साकोडेचा डोंगर, मळगाव, भवाडेचा डोमदर डोंगर,यांच्यासह अनेक लहान मोठे डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी रोजच पडत आहेत. या डोंगरांमधील धुमस्त्या आगीनी जंगल होत्याचे नव्हते झाले आहेत. यामध्ये अनेक वन्यजीवांसह सरपटणाऱ्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर सुरक्षितता म्हणून या डोंगरावरून त्या डोंगरांवर जाणारे इतर वन्यप्राणी ही रोजच लागणाऱ्या आगीमुळे थेट मानवी वस्ती कडे येताना दिसून येत आहेत पच्चीम आदिवाशी भागातील सर्वच डोंगर हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने हे डोंगर एन उन्हाळ्यात बोडके होऊन काळेकुट्ट पडल्याचे चित्र दिसत आहे .अनेक ठिकाणी राखीव वनक्षेत्र या वणव्यात होरपळून निघाल्याने गेली अनेक वर्षे स्थानिकांनी केलेल्या मेहनतीला पाणी फिरले आहे .तर राष्ट्रीय पक्षी मोर व अन्य अनेक वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या आगी का लागतात का लावण्यात येतात याचे उत्तर मात्र सध्या कोणाकडेच नसल्याचे दिसून येत आहे. निसर्ग समृद्ध बागलाण म्हणून ज्या बागलाणची जिल्ह्यात ओळख आहे त्याच बागलाणच्या जंगलांना लागलेल्या आगी वनविभागाला आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या ठरत आहेत. या आगीची धग सध्या सोशल मीडियात धुमसत असून अनेक वन्यप्रेमीकडून या आगीबद्दल तीव्र प्रतिक्रिया देत ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते वनविभाग सुस्त का आहे? असा ही सवाल उपस्थित केला जातो आहे.