नवी दिल्ली – संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्याच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाने ठोस निर्णय घेतला आहे. त्यामुळेच विविध देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या १०१ संरक्षण वस्तूंवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (९ ऑगस्ट) येथे केली. या सर्व वस्तू भारतातच उत्पादित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणल्या गेल्यानंतर भारताने आत्मनिर्भरतेवर अधिक भर देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळेच संरक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात परकीयांवर अवलंबून राहण्यापेक्षा देशांतर्गत ही उत्पादने बनवावीत. याद्वारे रोजगार निर्मिती आणि देशातील उद्योगांना चालना देण्याचा विचार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले आहे. बंदी घालण्यात आलेल्या १०१ आयात उत्पादनांच्या यादीत ‘आर्म्ड फायटिंग व्हेईकल्स’चाही समावेश करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाने २०२०-२१ ची खरेदी ही देशी आणि विदेशी मार्गात विभागली आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात जवळपास २ हजार कोटी कोटी रुपयांचा वेगळा अर्थसंकल्प तयार केले जाणार असल्याचेही सिंह यांनी सांगितले आहे.
सर्वांशी चर्चा करुनच निर्णय
संरक्षण क्षेत्रात घरगुती उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालयाकडून एक यादी तयार करण्यात आली आहे. भारतीय लष्कर, जनता आणि खासगी व्यावसायिक यांच्याशी चर्चा करून ही यादी तयार करण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले आहे. अशा उत्पादनांच्या जवळपास २६० योजनांसाठी तिन्ही सेना दलांनी एप्रिल २०१५ पासून यंदा ऑगस्ट २०२० पर्यंत जवळपास साडे तीन लाख कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्टस दिले आहेत. एका अंदाजानुसार, येत्या ६ ते ७ वर्षांत स्थानिक संरक्षण इंडस्ट्रीला जवळपास ४ लाख कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट दिले जाणार असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले आहे.