मुंबई – गेल्या महिनाभरापासून निर्बंध उठवल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टाळेबंदी हटवण्याच्या प्रक्रीयेसंदर्भात खूप दक्षता घेत आहेत. निर्बंध काढले जात असले तरी मागणी नंतरही धार्मिक स्थळं, चित्रटगृह, व्यायामशाळा उघडण्यात आल्या नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणुचे रुग्ण शोधणे, त्यांच्या चाचण्या आणि उपचारांमध्ये राज्य सरकारच्या अग्रेसर भूमिकेमुळे गेल्या महिनाभरात या संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडल्याचे टोपे म्हणाले. या चाचणीसाठी ४०० प्रयोगशाळा कार्यरत असून दररोज ५० हजार चाचण्या होत आहेत, असे त्यांनी नमुद केले.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८० टक्के असून मृत्यू दर दोन पूर्णांक चार दशांश आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांचे प्रमाण दोन टक्के आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात आघाडीवर राहून कार्यरत असलेले आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी प्रशंसेला पात्र असल्याचं टोपे यांनी म्हटले आहे.