त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर विविध विकास सोसायटीच्या चेअरमनपदाचा कार्यभार श्रीमती लक्ष्मीबाई पवार यांनी स्विकारताच कर्जवाटप सुरू झाले आहे. तीन वर्षांपासून बंद असलेले शेतकरी सभासदांचे पिक कर्जवाटप कधी सुरू होणार याची प्रतिक्षा आता संपली आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी नाना पन्हाळे यांना कर्जाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी संचालक चिंतामण अकोलकर, मोहन लोहगावकर, मनोज थेटे,मोहन कडलग, अरूण दाते, मंगेश धारणे, अकबर मनियार, सचिव महाले यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळेस उपस्थितांनी आनंद व्यक्त करतांना नावाच्या चेअरमन असलेल्या लक्ष्मीबाई यांनी सोसायटीत लक्ष्मी आणली असे म्हणत समाधान व्यक्त केले आहे. सोसायटीला वाटपा साठी मिळालेली रक्कम कमी आहे मात्र शेतक-यांना जमेल तसे कर्ज देऊन शेतकरी सभासदांना आधार देण्यात येत आहे. शासनाने कर्जमाफीची रक्कम दिल्या नंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तालुक्यासाठी ४ कोटी रूपये दिले आहेत.वास्तवीक पाहता २३ सोसायटया आणि शेकडो सभासद असलेल्या तालुक्याला ही रक्कम म्हणजे अगदीच कमी आहे मात्र तीन वर्षांपासून बंद असलेले कर्जवाटप सुरू करण्यास चालना मिळाली आहे. सोसायटी कार्यालयात सभासदांचा राबता वाढल्याने वातावरणात चैतन्य आले आहे.