नाशिक – कामगार व शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकारने मागे घ्यावे, कोरोना काळात अत्यल्प उत्पन्न असलेल्या नागरिकांना दरमहा ७ हजार ५०० रुपये थेट मदत करा, या मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
क्रांती दिनाच्या निमित्ताने हुतात्मा स्मारक व शाहिद स्मारक येथे अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तीव्र निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी असंघटित कामगार, आयकर पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकांना दरमहा ७५०० रु आर्थिक मदत केंद्र सरकारने द्यावी. कोरोनामुळे लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. प्रत्येकाला १० किलो धान्य, डाळ, जीवनावश्यक वस्तू पुरवठा मोफत दरमहा आणि दर माणशी द्यावा. रेल्वे खाजगीकरण करु नये. मनरेगा मजूरांना ५०० रुपये किमान वेतन व प्रत्येकी २०० दिवस काम द्या, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या प्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते डॉ डी एल कराड, आयटक राज्य सचिव राजू देसले, व्ही डी धनवटे, राज्य सरकारी कर्मचारी नेत्या सुनंदा जरांडे, श्याम सुंदर जोशी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नेते अरुण आहेर, मंगल भवर, विजय महाले, सफाई कामगार नेते महादेव खुडे, एलआयसी नेते मोहन देशपांडे, अरुण म्हस्के, सीताराम ठोंबरे, दत्तू तुपे, सचिन मालेगवकर, मुकुंद रानडे, दिलीप थेटे, तुकाराम सोनजे , पवार आदी उपस्थित होते.