नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य निवडणूक आयोगाने दोन महिन्यांपूर्वी गट व गणाची प्रारूप रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. प्रारूप रचना, हरकती, त्यावरच्या सुनावणी आणि अंतिम रचना हे पाहता ही निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक लांबणीवर पडली तर जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नेमणूक होण्याची शक्यता आहे.
विद्यमान जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २१ मार्च रोजी संपणार आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यातच निवडणूक आचारसंहिता लागली होती, आणि २१ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत ७२ गट असून त्यात आणखी नऊ गट आणि पंचायत समित्यांच्या १८ गणांची भर पडणार आहे. या एकंदरीत प्रक्रियेचा अप्रत्यक्ष परिणाम आरक्षण सोडत जाहीर होण्यापासून तर एकूणच निवडणूक प्रक्रियेवर होणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदांमध्ये किमान ५० तर कमाल ७५ इतकी सदस्य संख्या सद्यस्थितीत मंजूर आहे. मात्र, या संदर्भातील महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९ (१) मध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. यानुसार ही सदस्य संख्या किमान ५५ तर कमाल ८५ जाणार आहे. या संदर्भातील विधेयक विधीमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. त्यानंतर नव्या गटाची व गणाची प्रक्रिया पूर्ण होईल.
गट आणि गणांच्या रचनेच्या कामाला सुरूवात
नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीकरीता गट आणि गणांच्या रचनेच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी निवडणूक शाखेस आयोगाकडून मिळालेल्या सूचनांनुसार, या संदर्भातील अहवाल राज्य निवडणूक आयोगापुढे प्रशासनाला सादर केला जातो आहे. ही प्रक्रिया पूर्णत्त्वाला गेल्यानंतर गट आणि गणांचे आरक्षण जाहीर होईल. गट आणि गणांची रचना जाहीर झाल्यानंतर रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे.