नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून कृषी पंप वीज धोरण योजनेतून येवला मतदारसंघातील नगरसुल उपकेंद्रांत ५ एमव्हीएचे अतिरिक्त रोहित्र तर अंगुलगाव व वडगाव बल्हे येथे ३३ केव्हीचे नवीन विद्युत उपकेंद्र मंजूर झाले आहे. या तीनही विद्युत उपकेंद्रांसाठी एकूण ७ कोटी रुपये खर्च येणार असून लवकरच या विद्युत उपकेंद्रांच्या कामाला सुरुवात होणार आहे.
येवला मतदारसंघातील विजेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून कृषी पंप वीज धोरण योजनेतून ७ कोटी रुपयांची दोन नवीन विद्युत उपकेंद्र आणि एका उपकेंद्रांच्या क्षमतेत वाढ केली जाणार आहे. नव्याने मंजूर झालेल्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रामध्ये अंगुलगाव येथे ३३ के.व्ही. नवीन विद्युत उपकेंद्र कृषी पंप वीज धोरण योजनेमधुन मंजूर झाले आहे. त्यासाठी ३ कोटी ४१ लक्ष खर्च येणार आहे. यासाठी असलेला जागेचा प्रश्न देखील मार्गी लागला असून महावितरणकडे जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. या उपकेंद्रांची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून या कामाला सुरुवात होणार आहे
नगरसुल सबस्टेशन मध्ये ५ MVA चे अतिरिक्त रोहित्र बसवणे हे काम कृषी पंप वीज धोरण मधुन मंजूर झाले आहे. त्यासाठी १ कोटी ३५ लक्ष खर्च येणार आहे.या कामाचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे. या उपकेंद्रातील अतिरिक्त रोहित्रामुळे चांदगाव, नायगव्हाण, अनकाई या गावांच्या वीजेचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. तर वडगाव बल्हे येथे ३३ के.व्ही. नवीन विद्युत उपकेंद्र कृषी पंप वीज धोरण मधुन मंजूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी २ कोटी १७ लक्ष निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. येवला मतदारसंघातील नगरसुल उपकेंद्रांत झालेली ५ MVA चे अतिरिक्त रोहित्रांची वाढ तसेच अंगुलगाव व वडगाव बल्हे येथे नवीन उपकेंद्र मंजूर झाल्याने परिसरातील गावांचा वीजेचा प्रश्न सुटणार आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे.