येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील बुंदेलपुरा काळोखे गल्ली भागामध्ये दोन वळू एकमेकांना भिडल्याने या वळूच्या झुंजमध्ये तीन चार चाकी वाहनांचे नुकसान झाले. स्थानिक तरुणांनी झुंज सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र झुंज सुटण्याच्या मार्गावर नव्हती. त्यामुळे स्थानिकांनी फटाके फोडून, पाणी मारले. पण, तरी झुंज सुटत नसल्याने अखेर अनेक तरुण गोळा झाले. त्यांच्या प्रयत्नानंतर तब्बल दीड तासानंतर ही झुंज सुटली. मात्र झुंजीचा थरार चालू असताना स्थानिक रहिवासी नागरिक हे भयभीत झाले होते. शहरात अनेक ठिकाणी अशा मोकाट जनावरांच्या झुंज होत असते. पण, प्रशासन सर्रास दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येवला शहरातील नागरिकांनी केला आहे. अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.