इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू होण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून (२४ जानेवारी) सुरू होण्याची चिन्हे आहेत. शाळा सुरू करण्यासाठी राज्यभरातून दबाव वाढत आहे. संस्थाचालकांनीही सरकारवर दबाव टाकला आहे. अखेर राज्याच्या शिक्षण विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांची मान्यता केव्हाही मिळू शकते आणि याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी यापूर्वीच शाळा सुरू करण्यासंदर्भात अनुकुल संकेत दिले आहेत. डॉ. टोपे यांनी स्पष्ट केले आहे की, राज्य सरकार कोरोनाच्या स्थितीवर अत्यंत काटेकोरपणे लक्ष ठेवून आहे. लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. त्यामुळेच १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ४२ टक्के मुलांनी लस घेतली आहे. हे प्रमाण लक्षणीय आहे.
राज्यभरात शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने म्हटले आहे की, सरकार योग्य पावले टाकत आहे. कुठलाही निर्णय घाईने घेण्यात आलेला नाही किंवा घेतला जात नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. लहान मुलांच्या आरोग्य हिताचा विचार करुनच शाळा बंदचा निर्णय झाला आहे. राज्यातील लसीकरणाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षात ९० टक्के जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर, दुसरा डोस घेण्याचे प्रमाण ६२ टक्के आहे. त्यात आता १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण वेगात सुरू आहे.
शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. राज्य टास्क फोर्सचा सल्ला घेऊन मुख्यमंत्री यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. टास्क फोर्सच्या काही सदस्यांनी शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी या प्रस्तावावर होताच सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे.