इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेत वक्फ संशोधन विधेयकावर मध्यरात्री उशिरा मतदान होऊन हे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजुने २८८ तर विधेयकाच्या विरोधात २३२ इतकी मते पडली. या विधेयकावर मध्यरात्रीपर्यंत चर्चा सुरू होती. त्यानंतर मतदान झाले. दरम्यान यावेळी ओवैसी यांनी विधेयकाची प्रत देखील फाडली. तर दुसरीकडे सत्ताधारी खासदारांनी या विधेयकाचं जोरदार समर्थन केले.
लोकसभेत हे विधेयक संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले. वक्फ सुधारणा विधेयक संसदेमध्ये सादर होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. वक्फ विधेयकात धार्मिक स्थळांबाबत काहीही नाहीये. केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीये. हा केवळ वक्फच्या संपत्तीच्या नियोजनाचा विषय आहे अशी भूमिका हे विधेयक संसदेत सादर करताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मांडली. मतदानापूर्वी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधक वक्फ संशोधन विधेयकाला असंवैधानिक का म्हणत आहेत ते माहीत नाही. हे विधेयक असंवैधानिक कसं आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे एकही कारण नाही असे सांगितले.
तर विधेयकाच्या चर्चेवेळी विरोधकांनी आक्रमक भूमिका मांडली. एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी या विधेयकावरील चर्चेवेळी म्हणाले की, सरकार मदराशांना लक्ष्य बनवत आहे. आता वक्फची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे. मुस्लिमांच्या जमिनीचा निर्णय अधिकारी घेतील. बिगर मुस्लिम व्यक्ती वक्फ बोर्ड चालवतील, या विधेयकाचा मुस्लिमांना काहीही फायदा होणार नाही.