मुंबई – विधानमंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने (कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन- महाराष्ट्र ब्रँच) विधानपरिषदेचे सहा आणि विधानसभेचे सहा अशा एकूण बारा सदस्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, आरोग्यमंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे आदी उपस्थित होते.
यावेळी विधानपरिषद सदस्यांना पुरस्कारांतर्गत सन २०१५-१६ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार ॲड. अनिल परब, २०१६-१७ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार विजय ऊर्फ भाई गिरकर यांना तर २०१७-१८ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार संजय दत्त यांना प्रदान करण्यात आला. २०१५-१६ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार ॲड. राहूल नार्वेकर, २०१६-१७ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार कपिल पाटील यांना तर २०१७-१८ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रवीण दरेकर यांना प्रदान करण्यात आला.
विधानसभा सदस्यांना पुरस्कारांतर्गत सन २०१५-१६ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार डॉ.अनिल बोंडे, २०१६-१७ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुभाष साबणे यांना तर २०१७-१८ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार राहुल कुल यांना प्रदान करण्यात आला. २०१५-१६ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रा. श्रीमती वर्षा गायकवाड, २०१६-१७ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार राजेश टोपे यांना तर २०१७-१८ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार धैर्यशील पाटील यांना प्रदान करण्यात आला.