इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
तेव्हा तुमच्या लक्षात येईल
असं पाहा, तुम्ही जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक व्हाल, तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्यामध्ये पूर्णतः निर्भेळ असे काहीही नाही. मात्र तुम्ही तुमच्या सर्वोच्च चेतनेच्या प्रकाशात, स्वतःकडे स्वतःच्या नजरेला नजर भिडवून पाहिलेत, तर मग, तुमच्या प्रकृतीमधील जे काही काढून टाकायची तुमची इच्छा असेल ते नाहीसे होईल. अशा संपूर्ण प्रामाणिकपणासाठी प्रयत्न केला नाही तर एखादा दोष किंवा त्याची लहानशी पडछाया पुन्हा वर येण्यासाठी, योग्य संधीची वाट पहात एखाद्या कोपऱ्यात टपून बसेल….
तुमच्या ठिकाणी एखादी लहानशी अप्रिय संवेदना किंवा थोडीशी जरी अस्वस्थता निर्माण झाली, तर पहा, तुमचे मन किती पटकन त्याविषयी अनुकूल स्पष्टीकरण देते! ते दुसऱ्या कोणावर तरी खापर फोडते किंवा परिस्थितीला दोष देत बसते. ते म्हणते की, “मी जे काही केले ते योग्यच होते; आणि त्याला मी जबाबदार नाही वगैरे वगैरे.” …स्वत:ची किंवा दुसऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून जर एखादे मूल अगदी लहानपणापासून स्वत:चे काळजीपूर्वक परीक्षण करू लागले, प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण करू लागले, तर ते त्याच्या अंगवळणी पडेल आणि त्यामुळे त्याचा नंतरचा बराचसा संघर्ष वाचेल.