तुळशी विवाह महात्म्य आणि मुहूर्त
- पंडित दिनेश पंत
प्रत्येक वर्षाची लग्नसराई ही तुळशी विवाहानंतर सुरू होते. यंदा कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजे 15 नोव्हेंबर पासून कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) म्हणजे 19 नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह आहेत.
तुळशी विवाह मुहूर्त
15 ते 19 नोव्हेंबर या दरम्यान सायंकाळी 6.32 ते 7. 30 या काळात शुभ मुहूर्त आहे.
तुलसी विवाह विधी व सामग्री
तुलसी विवाहासाठी तुळशी, नवी साडी, खण नारळाची ओटी, कलश, फुले, हार, ऊस, अक्षदा, हळद, कुंकू, महानैवेद्य, नंदादीप हे साहित्य लागते….
विवाहविधी
तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे लग्न. शाळीग्राम रुपी भगवान श्री विष्णू यांच्याशी तुळशीचे लग्न लावले जाते. यासाठी नियमित लग्नासाठीची तयारी असते. त्याचपद्धतीने साहित्य घेतात. प्रथम तुळशी वृंदावनाला रंगरंगोटी करावी. तुळशी भोवती रांगोळी काढावी. फुलांची आरास करावी. तुळशीला साडी-चोळी, बांगड्या, हिरवा चुडा अर्पण करावा. खणानारळाने ओटी भरावी. तुळशी समोर सुशोभित पाटावर फुलांची आरास करावी. शाळीग्राम अथवा कृष्ण मूर्ती पाटावर ठेवावी. त्यास नूतन वस्त्र अर्पण करावीत.
तुळशीजवळ मंगल कलश मांडावा. तुळशीचे मामा म्हणून ऊस उभा करावा. तुळशीला हळद, कुंकू वाहावे. दिलेल्या शुभमुहूर्तावर तुळशी वृंदावन व पाटावरील शाळिग्राम यामध्ये अंतरपाट धरावा. मंगलाष्टका म्हणत तुळस व भगवान विष्णू यांचे लग्न लावावे. नंतर मंगलाष्टक समाप्तीनंतर मंगल वाद्य वाजवावीत. शंखध्वनी करीत अंतरपाट बाजूला करावा. तुळशी वृंदावनात शाळीग्राम रुपी वर देवास स्थानापन्न करावे. वधू-वरांची भेट घडवावी. उपस्थितांनी वधू-वरांवर अक्षदा वाहाव्यात. शेवटी गणपतीची आरती, देवीची, कृष्णाची, तुळशीची आरती करावी. कर्पूरारती, मंत्र पुष्पांजली म्हणून महाप्रसाद वाटप करावे. तुळशी विवाह म्हणजेच चातुर्मास समाप्ती होय.