नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष तसेच तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांनी महाराष्ट्रात जम बसविण्यास सुरुवात केली आहे. याच अंतर्गत त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुमाउलीच्या निर्णयाला येण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ केसीआरच नव्हे तर त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ पांडुरंगाचे दर्शन घेणार आहे. तसेच हेलिकॉप्टरद्वारे वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी होणार आहे. या निमित्ताने केसीआर येत्या निवडणुकांचा शंखनाद करणार असल्याची चर्चा आहे.
देशात शेतकऱ्यांचे राज्य आणण्याची घोषणा देत कामाला लागलेले चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या गळाला महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते लागले आहेत. यातच महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवण्यासाठी बीआरएसने वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठ्या महासोहळ्याची निवड केली आहे. यासाठी त्यांनी आषाढ शुद्ध नवमीची निवड केली आहे. या दिवशी चंद्रशेखर राव हे पंढरपूरला येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. देशात शेतकऱ्यांचे राज्य येऊ दे असे साकडे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या या देवाला करणार असल्याची माहिती बीआरएस पक्षाचे राज्याचे समन्वयक शंकर आण्णा धोंडगे यांनी दिली आहे.
अब की बार किसन सरकार असे म्हणत बी आर एस पक्ष महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी थेट वैष्णवांचा महामेळा असणाऱ्या आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला आहे. आषाढी वारीसाठी गेले अनेक वर्षापासून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिगविजय सिंग येत असतात. पण आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आता संपूर्ण मंत्रीमंडळासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. आषाढीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री दर्शनाला येतील. सोबत तेलंगणाचं सर्व मंत्रिमंडळ त्या दिवशी पंढरपुरात असेल. परवानगी मिळाली तर वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करणार आहेत.
वारकऱ्यांशी संवाद
विठ्ठल दर्शनासोबत ते वारकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दशमी दिवशी म्हणजे २८ जून रोजी पंढरपूरमध्ये येत असताना त्याच्या एक दिवस आधी चंद्रशेखर राव पंढरपुरात पोहोचणार आहेत. आषाढीपूर्वीच पुण्यापासून सर्व पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात बीआरएसकडून जोरदार होर्डिंगबाजी करण्यात आली आहे.