मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भटक्या कुत्र्यांनी देशात दहशत निर्माण केल्याचे दिसून येत आहे. अनेक शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने, कुत्राचा चावा घेतल्याच्या घटनेत वाढ झाली. कुत्र्यांच्या भीतीने लहान मुलांसह नागरिक रात्रीचे १० नंतर घरा बाहेर पडण्यास भीत आहेत, एवढी दहशत भटक्या कुत्र्याची शहरात निर्माण झाली. महापालिकेने भटक्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावी, अशा मागणीने शहरात जोर धरला आहे. देशात भटक्या कुत्र्यांची दहशत झपाट्याने वाढते आहे. गेल्या साडे तीन वर्षांत भटकी कुत्री आणि इतर प्राण्यांनी माणसांना किंवा इतर प्राण्यांना चावा घेतल्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. दररोज सरासरी अशा चावा घेतल्याच्या सरासरी 12, 256 घटना दाखल केल्या जात आहेत. हा आकडा धक्कादायक असाच म्हणायला हवा.
भटके कुत्रे रस्त्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक,लहान मुले,महिला यांना अधिक त्रास होतो. रात्री उशिरा घरी परतणार्यांनाही कुत्र्यांची भीती असतेच. शिवाय सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्याच्या पाठीमागेही कुत्रे लागतात. त्यात एखादा कुत्रा पिसाळला किंवा जखमी झाला तर त्या परिसरात धुमाकूळ घालतो. शहरातील हौसिंग सोसायट्यांमधील रहिवासी कुत्र्यांना वैतागले आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी याआधी ज्येष्ठ नागरिक संघटना, नगरसेवक व इतर संघटना, राजकीय पक्षांनीही पालिकेकडे केली होती. मात्र पालिकेचे अधिकारी गांभीर्याने बघत नसल्याने ही समस्या अधिक जटील बनत चालली आहे. कुत्रा चावणे (श्वान दंश) याची सर्वाधिक प्रकरणे ही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, प. बंगाल आणि आंध्रप्रदेशात दाखल करण्यात येत आहेत. केंद्रीय पशुपालन आणि डेअरी मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी ही माहिती दिली आहे.
आयडीएसपी आणि आयएचआयपीच्या माहितीनुसार,
2019साली प्राण्यांकडून चावा घेतल्याच्या 72 लाख 77 हजार 523 प्रकरणे घडली आहेत.
2020 साली ही संख्या 46 लाख 33 हजार 493 इतकी आहे.
2021 साली 17 लाख 01 हजार 133 प्रकरणे समोर आली आहेत.
जुलै 2022 पर्यंत देशात 14 लाख 50 हजार 666 प्रकरणे समोर आली आहेत. तसेच सरकारी आकडेवारीत दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या साडे तीन वर्षांत भटके कुत्रे आणि इतर प्राण्यांनी चावा घेतल्याच्या सर्वाधिक घटना या उत्तर प्रदेशात घडलेल्या आहेत. 27.52 लाख जणांना चावा घेतल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
या आकडेवीरीत महाराष्ट्राचाही क्रमांक वरचा आहे. आपल्या राज्यातही चावा घेतल्याची अनेक प्रकरणे होत आहेत. गेल्या साडे तीन वर्षांच्या विचार केल्यास
महाराष्ट्र- 15.75 लाख
तामिळनाडू 20.70 लाख
पश्चिम बंगाल- 12.09 लाख
गुजरात – 11.09 लाख
आंध्रप्रदेश- 9.51 लाख
बिहार- 5.57 लाख
मध्य प्रदेश – 5.30 लाख
ओडिशा- 3.91 लाख
गेल्या साडे तीन वर्षांत भटके कुत्रे आणि प्राण्यांनी चावा घेतल्याच्या देशभरात 1कोटी 60 लाख 62 हजार 815 प्रकरणे समोर आली आहेत. या सगळ्याची दिवसाची सरासरी विचारात घेतली तर ती साधारणपणे 12 हजार 256 इतकी मोठी आहे.
अशी घ्या काळजी
नागरिकांनी त्यांच्यासह लहान मुलांना भटक्या व पाळीव प्राण्यांपासून सावध ठेवावे. प्राणी चावल्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी यावे. कुत्रा चावल्यावर जखम झाकू नका, जखम उघडीच ठेवा. स्वच्छ पाण्याखाली जखम धुवून घ्या, त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी यावे. सकाळी ओपीडी विभागात (क्रमांक १०५) तर दुपारी आपत्कालीन विभागाला कक्ष क्रमांक एकमध्ये भेट द्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.
Stray Dogs Bite Cases Country Report Maharashtra