श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला:
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-१३:
राष्ट्रीय चळवळीत थेट सहभाग
बडोदा संस्थानामध्ये असलेल्या विशेष हुद्द्यामुळे श्रीअरविंद घोष यांना जाहीररित्या कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होता येणे शक्य नव्हते त्यामुळे, शेवटचा काही काळ ते सुट्टीवर राहून, पडद्याआडून राजकीय हालचालींमध्ये सक्रिय राहिले. इ. सन १९०५ साली मात्र वंगभंगामुळे उसळलेल्या जनक्षोभ आंदोलनामुळे त्यांना बडोदा येथील सेवेतून मुक्त होण्याची संधी मिळाली आणि तेव्हा त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. याच वर्षी बंगालची फाळणी झाली आणि त्यानंतर जी एक बंडाची धुमाळी उडाली त्यामध्ये, जहाल पक्षाच्या उदयाला आणि महान राष्ट्रीय चळवळीला चालना मिळाली. तेव्हा श्रीअरविंद घोषांचे सर्व कृतिकार्यक्रम अधिकाधिकपणे त्या दिशेने वळू लागले.
युगांतर
बारीन्द्र यांच्या (श्रीअरविंदांचे धाकटे बंधू) सूचनेनुसार, श्रीअरविंदांनी ‘युगांतर’ नावाचे एक वृत्तपत्र प्रकाशित करावयास संमती दिली; ह्या वृत्तपत्रातून ब्रिटिश सत्तेचा पूर्ण निषेध आणि उघड विद्रोह याची शिकवण दिली जात असे. त्या वृत्तपत्रामध्ये ‘गनिमी कावा’ या युद्धपद्धतीविषयी पद्धतशीर प्रशिक्षण देणारी लेखमालिका चालविली जात होती. या वृत्तपत्राच्या प्रारंभिक अंकांमधून श्रीअरविंदांनी स्वत: काही लेख लिहिले होते आणि कायमच त्या वृत्तपत्रावर त्यांचे सर्वसाधारणपणे नियंत्रण असे. एका लेखाच्या संदर्भात चौकशीसाठी, वृत्तपत्राच्या मुख्य संपादकांच्या शोधात आलेल्या पोलिसांना संपादकीय विभागातील एक सदस्य – स्वामी विवेकानंदांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त – आपणहून शरण गेले होते.
आणि जेव्हा त्यांच्यावर खटला चालविण्यात आला होता तेव्हा, श्रीअरविंदांच्या आदेशानुसार ‘युगांतर’ने, ‘आम्ही विदेशी शासन ओळखत नाही’ या कारणास्तव, ब्रिटिश न्यायासनासमोर स्वत:ची बाजू मांडण्यास नकार दिला होता. परिणामी या वृत्तपत्राची प्रतिष्ठा आणि प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढीस लागला. त्यावेळी बंगालमधील तीन युवा लेखक या वृत्तपत्राचे मुख्य लेखक व संचालक होते; एकाएकी या वृत्तपत्राचा बंगाल प्रांतामध्ये प्रभाव वाढला. इ. स. १९०६ मध्ये श्रीअरविंद घोष यांनी बडोदा सोडले आणि नव्याने स्थापन झालेल्या ‘बंगाल नॅशनल कॉलेज’च्या प्राचार्यपदी रूजू होण्यासाठी ते कलकत्त्याला गेले.
बंगाल नॅशनल कॉलेजच्या स्थापनेमुळे श्रीअरविंदांना आवश्यक असलेली संधी चालून आली आणि त्यामुळे बडोदा संस्थानमधील नोकरीचा राजीनामा देऊन ते या नवीन कॉलेजचे प्राचार्य म्हणून रुजू होऊ शकले. श्रीअरविंदांच्या गुप्त कार्यामधील त्यांचे सहकारी आणि नंतरच्या काळातदेखील काँग्रेसप्रणीत राजकारणामध्ये त्यांचे सहकारी असणारे श्री. सुबोध मलिक; यांनी या कॉलेजच्या स्थापनेसाठी एक लाख रूपये देऊ केले आणि श्रीअरविंदांना या कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर दरमहा १५० रू. पगारावर नेमण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली; अशा प्रकारे देशकार्याच्या सेवेमध्ये पूर्ण वेळ देण्यासाठी श्रीअरविंद घोष आता पूर्णपणे मोकळे झाले.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part 13