मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना या नावासह पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट मातोश्रीचा ताबा घेणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला कुठल्याही मालमत्ता वा संपत्तीचा मोह नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाने शिंदे मातोश्रीचा ताबा घेण्यावरून उठलेल्या वादंगाला पूर्णविराम मिळाला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध समाज घटाकांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेना नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. हा निर्णय मेरीटवर झाला आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेणे चूक आहे. न्यायव्यवस्थेचे काही अधिकार असतात. लोकशाहीत ही संस्था स्वायत्त आहेत. आयोगाच्या निर्णयाचे जनतेने स्वागत केले आहे. मात्र निर्णय बाजूने लागला की चांगला आणि विपरीत लागला की अयोग्य असे म्हणणे चुकीचे आहे. नाव आणि चिन्ह मिळाल्याने विधिमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र कोणत्याही मालमत्तेवर किंवा संपत्तीवर दावा करायचा नाही. त्याचा मोह नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ब्राह्मण समाज नाराज नाही
ब्राह्मण समाज नाराज नाही. विरोधकांकडून मुद्दामहून ही अफवा पसरवली जात आहे. कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला नाही, हे मतदार ठरविवात. त्यामुळे अजित पवार काही विधाने करत असली तरी त्यात तथ्य नाही. सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे जनता भाजप-शिवसेना युतीबरोबर आहे. कसब्यात युतीचा उमेदवार विजयी होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
सत्तेसाठी विचारांना तिलांजली
भाजप-शिवसेनेने युती म्हणून निवडणूक लढविली. मात्र, सत्तेसाठी, खुर्चीसाठी विचारांना तिलांजली देण्यात आली. कोणी काही आरोप करत असले तरी त्यावर बोलायचे नाही. खुर्चीसाठी विचारांना तिलांजली दिल्यानेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे, अशी टीका शिंदे यांनी शिवसेनेवर केली.
https://twitter.com/mieknathshinde/status/1627703695067738112?s=20
Shivsena Eknath Shinde Next Strategy Politics