मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षात उभी फूट पडत असतानाही आता मूळ पक्षामधील राज्यभरातील शिवसैनिकांचा लोंढा मुंबईकडे येत आहे. त्यातच शिवसेना प्रक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, महिला पदाधिकारी यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. हे बैठका सत्र सुरू असतानाच राज्यभरातून शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसेना भवन तसेच मातोश्रीवर गर्दी करत आहेत, ही गर्दी वाढत असतानाच आज अचानक सकाळी एक दुर्दैवी घटना घडली.
उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या एका शिवसैनिकाचा मातोश्रीबाहेर रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने या शिवसैनिकाचे निधन झाले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जाते आहे. शहापूर तालुक्यातले भगवान काळे हे मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते. त्यांना उद्धव ठाकरेंची भेट घ्यायची होती. वाशाळा गाव येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन ते आपल्या गाडीने वांद्रे कलानगर येथील मातोश्री या निवासस्थानी आले होते.
मातोश्रीत बैठक सुरु असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं होते. भगवान काळे यांना नंतर कलानगरच्या रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. भगवान काळे यांच्या मृत्यूने शहापुरातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसह सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर आता उद्धव ठाकरेंनी बैठकांचा धडाका लावला आहे. आधी आमदार, खासदार, त्यानंतर जिल्हा प्रमुख आणि मग महिला आघाडीच्या बैठकाही उद्धव ठाकरेंनी घेतल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता खरी शिवसेना नेमकी कुणाची हा वाद कोर्टात पोहोचला आहे. त्यामुळे कोर्टात नेमके काय होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एके दिवशी संध्याकाळी भावनिक भाषण केले. सत्तेचा मोह नाही, आजच वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडण्याची घोषणा त्यांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास केली, आणि रात्री साडे नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वर्षा निवासस्थान सोडले.
उद्धव ठाकरे हे वर्षावरुन निघताना त्यांना निरोप देण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना वर्षा निवासस्थानातून निघताना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाहेर येऊन त्यांना अभिवादन केले आणि वर्षा निवासस्थान सोडण्याची घोषणा केली, त्यानंतर त्यांचे सामान बहेर येण्यास सुरुवात झाली. साडे नऊच्या सुमारास ते निघाले तेव्हा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
त्याचप्रमाणे वर्षा निवासस्थान सोडताना वरळी सी लिंकमार्गे जाताना वाटेत ठिकठिकाणी शिवसैनिक गर्दी करुन उभे होते. उद्धव ठाकरे हेही खिडकीतून हात काढून या शिवसैनिकांचे प्रेमाला अभिवादन करत होते. वर्षा ते बांद्राचे मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाच्या ९ किलोमीटरच्या प्रवासाला सुमारे तासाभराहून अधिक काळ लागला.
ठिकठिकाणी शिवसैनिक हे हातात झेंडे हातात घेूऊन आणि घोषणाबाजी करताना पाहायला मिळत होते. या सगळ्या रस्त्यातून मुख्यमंत्र्यांचा कॉन्व्हॉय जात असताना, त्यांना परतावे लागल्याचे दुख प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात जाणवत होती. अडीच वर्षांच्या काळातच आपल्या नेत्याला असे घरी परतावे लागल्याचे दुख अनेकांच्या घोषणांतून आणि प्रतिक्रियांतून जाणवत होते. महिला शिवसैनिकांचीही या ठिकाणी विशेष गर्दी झाली होती. मुख्यमंत्रीही वाटेत ठिकठिकाणी उतरुन शिवसैनिकांचे हे प्रेम आवर्जून स्वीकारत होते.
Shivsainik Death Outside Matoshri Uddhav Thackeray Heart Attack