मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार प्रताप सरनाईक यांच्या सिक्युरिटी फर्मविरोधात गैरसमजातून तक्रार दाखल करण्यात असल्याची माहिती विशेष पीएमएलए न्यायालयाला टॉप्स ग्रुपचे माजी संचालक रमेश अय्यर यांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी तपास दफ्तरबंद करण्यासंदर्भात दाखल केलेल्या‘सी-समरी’ अहवालावर आक्षेप नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे सरनाईक यांच्यामागील ईडीचा ससेमिरा आता थांबेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एम. एस. बडे यांनी १४ सप्टेंबर रोजी मूळ गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला ‘सी-समरी’ अहवाल स्वीकारला होता. म्हणजेच पोलीस या गुन्ह्याचा तपास दफ्तरबंद करू शकतात. तसेच न्यायालयाने ‘सी-समरी’ अहवाल स्वीकारल्याने मूळ गुन्हादेखील रद्द झाला आहे. त्यामुळे पीएमएलएअंतर्गत ईडीने दाखल केलेला गुन्हा टिकू शकत नाही. या सगळ्यानंतर आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशीधरन यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात केला आहे. ईडीने शशीधरन यांना अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. टॉप्स ग्रुपचे प्रवर्तक राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांच्यावरही हाच गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही अटक करण्यात आली आहे. सरनाईक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आहेत.
अमित चांदोले यांनीही न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्याची व ईडीने मागितलेली रिमांड फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. तथापि, विशेष न्यायालयाचे न्या. एम. जी. देशपांडे यांनी चांदोले यांची न्यायालयीन कोठडी वाढविणे योग्य असल्याचे म्हणत पुढील सुनावणी २१ सप्टेंबरला ठेवली आहे.
Shinde Group Leader ED Enquiry Will Stop soon
Pratap Sarnaik