मुंबई – राज्यभरातील शाळा तब्बल दीड वर्षानंतर पुन्हा आज भरणार आहेत. सकाळ सत्रातील काही शाळा सकाळीच सुरू झाला तर दुपार सत्राच्या शाळा थोड्याच वेळात सुरू होत आहेत. शाळा प्रवेशाचा उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळेच रांगोळी, पताके आणि विविध बाबींनी शाळा नटल्या आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. याचनिमित्ताने राज्यात शिक्षणोत्सव साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात विद्यार्थी व शिक्षकांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत.
ऑनलाईन पद्धतीने सध्या शाळा सुरू असल्याचे तरी त्यात असंख्य अडचणी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू कराव्यात, या मागणीने जोर धरला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सध्या शाळा सुरू आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य टास्क फोर्सने शाळा सुरू करण्यास मान्यता न देण्याचे सूचविले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव नाकारला होता. मात्र, आता राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. तसेच, लसीकरणाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शाळा सुरू होणार असले तरी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाने मागविली आहे. ज्या शिक्षकांचे लसीकरण बाकी आहे त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. शाळा सुरू करण्याबाबतची सर्व प्रकारची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहरी भागात इयत्ता ८वी ते १२वी तर ग्रामीण भागात ५वी ते १२वीचे वर्ग सुरू होत आहेत.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1444886624282677251