इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील अक्षुण्ण परंपरा लाभलेल्या एकमेव शृंगेरीपीठाचे शंकराचार्य श्री श्री भारतीतीर्थ महास्वामी यांच्या हस्ते, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, व्दारका पीठ आणि ज्योतिष पीठाच्या नवनियुक्त शंकराचार्य यांच्यावर अभिषेक करण्यात आला. गेल्या ७०-७५ वर्षातील ही दुर्लभ घटना समजली जाते.
शृंगेरी पीठाचे निकटवर्ती नाशिकचे स्मार्तचुडामणि पं. शांतारामशास्त्री भानोसे यांनी ही माहिती ‘इंडिया दर्पण’ला दिली. जगद्गुरू श्रीशंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निर्वाण दिनी, दि. १२ सप्टेंबरला, पश्चिमाम्नाय व्दारका पीठावर श्रीस्वामी सदानंद सरस्वती आणि ज्योतिष पीठाधिश्वर म्हणून स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
त्यानंतर काल सोमवारी नवनियुक्त शंकराचार्यांनी शृंगेरी पीठाधिश्वर जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री भारतीतीर्थ यांचे दर्शन घेतले. पीठाची अधिष्ठात्री देवी शारदेच्या मंदिरात स्वतः स्वामींनी दोघांवर वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक केला, त्यांना विशेष कमंडलू दिले. तसेच दोन्ही पीठाच्या या नियुक्त्यांवर मान्यतेची मोहोर उठविली. अलिकडच्या काळात आद्य शंकराचार्य परंपरेत ही विशेष घटना मानली जाते.
पं. भानोसे यांनी सांगितले, दोन्ही नवनियुक्त शंकराचार्यांच्या मस्तकावर हात ठेवून ‘मी अभिषेक करीत आहे’ (म्हणजे मान्यता देत आहे), असे श्री स्वामींनी घोषित केले. बंगलुरु येथे २००७ मध्ये चतुष्पीठ संमेलनात या दोघांच्या नावाची घोषणा स्वामी स्वरूपानंद यांनी केली होती. तसेच भविष्यात त्यांच्यावर अभिषेक करावा, अशी विनंती श्री शंकराचार्य श्री श्री भारतीतीर्थ यांना केली होती. आता व्दारका व ज्योतिष पीठात होणाऱ्या पीठारोहण सोहळ्यात शृंगेरीचे उत्तराधिकारी श्री स्वामी विधुशेखर भारती उपस्थित राहून वैदिक विधि करतील.