मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर झाल्या आहेत. सध्या शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू आहेत. शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशानुसार, येत्या २० ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्या लागणार आहेत. ही सुटी ७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यातच ८ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आहे. त्यामुळे त्यादिवशीही सुटी आहे. परिणामी, ९ नोव्हेंबरला शाळा सुरू होणार आहेत. परिणामी, शाळांना तब्बल १८ दिवस सुटी मिळणार आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळांना दिवाळी निमित्त सुटी दिली जाते. यंदा दिवाळीला २१ ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे. २१ ऑक्टोबर रोजी वसुबारस आहे. २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीच्या निमित्ताने यंदा १८ दिवस शाळा बंद राहणार आहेत. कोरोनामुळे शाळा दोन वर्षांपासून बंद राहिल्या होत्या. आता कुठे नियमित शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे शिक्षकांचे लक्ष असणार आहे.
पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना अंकगणित, अक्षर ओळख व्हावी यासाठी सध्या विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षण घेता न आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जात आहे. दिवाळी सुटीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयावर निंबध लिहिणे, वाचन सराव, अंक व अक्षर ओळख याकडे लक्ष द्यायचे आहे. शिक्षकांना त्याची सक्ती नाही, पण स्वेच्छेने शिक्षकांनी ते काम करायचे आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
School Diwali Holiday Declare Education Dept
Vacation