सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील प्रसिद्ध सराफ व्यापारी धनश्री अलंकारचे संचालक धनंजय अशोकराव वानखेडे वय ५५ यांनी काल शनिवारी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील दोधेश्वर येथील डोंगरावर असलेल्या मंदीरापासून काही अंतरावर विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज रविवार सकाळी ६:३० वाजता उघडकीस आली. वानखेडे यांच्या जवळ चिठ्ठी आढळल्याने आत्महत्येचे गुढ वाढले आहे.
शहरातील धनश्री अलंकारचे संचालक अशोक वानखेडे यांची दुचाकी मोटरसायकल काल शनिवार रोजी दोधेश्वरच्या जंगलात बेवारस आढळून आली होती. याची खबर मिळताच मोटर सायकल कुणाची हे पाहण्यासाठी काही तरूण गेले असता सदरची दुचाकी वाहण वानखेडे यांचे असल्याचे निष्पन्न झाले.
काल शनिवारी दुपार पासूनच वानखेडे घरी नसल्याने अहीर सुवर्णकार मंडळाचे अध्यक्ष विलास दंडगव्हाळ , सामाजिक कार्यकर्ते अनिल पाकळे , शहरातील तरूण व पोलीसांनी दोधेश्वर जंगलाकडे धाव घेतली. वानखेडे यांचा रात्री १०:३०वाजेपर्यंत शोध घेतला असता ते मिळून आले नाही व त्यांचा मोबाईल देखील बंद होता. जंगलात बिबट्यांची भिती असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू असलेला वानखेडेंचा शोध थांबवला. आज रविवार सकाळी ६:३० वाजता स्थानिक नागरीकांना वानखेडे यांचा मृत्य देह दोधेश्वर डोंगरावर आढळला त्यांच्या मृत देहाजवळ डोक्याच्या दिशेने चप्पल, पाण्याची बाटली, विषारी द्रव्ये व चिठ्ठी आढळून आली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला.
वानखेडे यांच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सावकारकीच्या व्यावसायातून त्यांची आत्महत्या झालीअसावी असा कयास लावला जात आहे ? चिठ्ठीत नेमका मजकुर काय आहे ? आत्महत्येस जबाबदार असना-यांची नावे तर नाहीत ना ? अशी एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून निरनिराळे तर्कवितर्क लावले जात आहे. ग्रामीण रूग्णालयात पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार आपल्या टिमसह दाखल झाले असून वानखेडे यांच्या जवळ आढळलेल्या चिठ्ठीतूनच त्यांच्या आत्म्याहत्याचे कारण उलगडेल आणी त्यातूनच पोलिसांना तपासाची दिशा मिळेल.