इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई येथे शनिवारी ‘सामना’ आणि ‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या संजय राऊत यांच्या लेखणीतून उतरलेला “नरकातला स्वर्ग (तुरुंगातले अनुभव)” या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार, उध्दव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, आजचा हा कार्यक्रम लक्षात राहणारा असा हा कार्यक्रम आहे. संजय राऊत यांनी जे काही १०० दिवस ‘आर्थर रोड’ या माहित असलेल्या जेलमध्ये घालवले आणि तिथले सगळे अनुभव लिखित स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांसमोर मांडले. कुणी गुन्हा केला असला, त्याच्यावर केस झाली असेल, त्याचा निकाल लागला असेल तर असं संकट काही लोकांवर येत असतं. पण संजय राऊत यांनी काय केलं होतं? संजय राऊत नेहमीच ‘सामना’मध्ये जी रोखठोक भूमिका मांडतात, ती आपल्या स्वभावाप्रमाणे मांडत असत. ती त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती, ते अस्वस्थ होते. मोठ्या संधीची ते वाट पाहत होते आणि त्यांना संधी दिली पत्रा चाळ ही जी एक वस्ती आहे त्या प्रकरणातून.
पत्रा चाळीमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. त्यांच्या निवाऱ्याचा काही प्रश्न निर्माण झाला. त्या चाळकऱ्यांना घरं मिळावीत, अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे होती आणि ते संजय राऊत यांच्याकडे पोहोचले. त्याच्यामध्ये संधी मिळाली ती त्यांच्या नेहमीच्या लिखाणामुळे जे दुखावलेले होते, त्या शासकीय यंत्रणेला. ईडी यांचं योगदान या प्रकरणामध्ये अधिक आहे. ईडीने जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊत यांचा यत्किंचितही संबंध नसताना त्यांना त्याच्यामध्ये गुंतवण्यात आलं. जिथं अन्याय होतो, अत्याचार आहे त्याच्या विरुद्ध ‘सामना’ उभा राहतो. ते काम अखंडपणाने त्यांचं चालू होतं. शासकीय यंत्रणेमध्ये जिथे भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचाराविरुद्ध ते नेहमीच लिहितात. याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच.
हे पुस्तक वाचल्यानंतर मी एवढंच विचार करतोय कधी महाराष्ट्र किंवा देशातल्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल की सामान्य माणसांचा, राजकीय पक्षांचा जो मूलभूत अधिकार आहे तो या ईडी कायद्याचा आधार घेऊन उध्वस्त करण्याची जी काही तरतूद कायद्यामध्ये झालेली आहे ती तातडीने बदलली पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल, ते करणं यामध्ये आम्हा लोकांना लक्ष द्यायची आवश्यकता आहे. म्हणून हे पुस्तक जे कोणी वाचतील, त्यातल्या त्यात राज्यकर्ते जे असतील त्यांनी हे सगळं गांभीर्याने बघण्याची गरज आहे. राज्य येतं- जातं, निवडणुका जिंकतात- हरतात. पण न्यायव्यवस्था ही लोकांसमोर आदर्श अशी असली पाहिजे. ती व्यवस्था ईडी सारख्यांच्या हातात दिलेल्या शक्तीमुळे जर आपल्याला निर्णय घेण्यासाठी इच्छा असून सुद्धा मर्यादा येत असतील तर ती बदलण्याची आवश्यकता आहे, याची खात्री ही आपल्या सगळ्यांना पटली.
माझ्या मते, राऊत यांनी हे पुस्तक लिहून फार मोठं काम केलं. त्यामुळे विचार करणारे लोक माझी खात्री आहे की याच्यात दुरुस्ती करण्याची जी आवश्यकता आहे, सत्तेचा गैरवापर हा सहज केला जातो. ही जी संधी राज्यकर्त्यांना आपण दिली, त्याच्यातून मुक्त होण्याचं काम हे करण्याबद्दलचं विचार करावा लागेल. राऊत यांच्या या पुस्तकामुळे आणि विशेषतः आता सांगण्यात आलं की, इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा करणार आहेत. त्याचा परिणाम निश्चित जे लोकप्रतिनिधी असतील, लोकशाही संबंधाची आस्था ज्यांच्यामध्ये आहे ते लोक त्याचा विचार करतील. त्या कामामध्ये तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की, अशांच्या पाठीशी उभं राहणं. हे काम केलं तर माझी खात्री आहे की, संजय राऊत यांनी जे लिखाण केलं ते खऱ्या अर्थाने फलदायी ठरलं, असा निष्कर्ष काढता येईल.