नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय तथा पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर निंदाजनक टीका हत्येला प्रवृत्त करणारी पोस्ट आणि त्यांचा खून करण्याबाबत भडकावून वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केली आहे. माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, सरचिटणीस संजय खैरनार, ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवती शहराध्यक्ष सोनिया होळकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी,धनंजय निकाळे, किशोरी खैरनार, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, महेश भामरे, मनोहर कोरडे, प्रफुल पवार, भालचंद्र भुजबळ, आकाश पगार, संकेत निमसे, निलेश जगताप, संगीता पाटील, प्रशांत पाटील, संतोष जगताप, नाना साबळे,प्रशांत पाटील, पुष्पलता उदावंत, सायरा शेखआदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे हिने अॅड. नितीन भावे ची पोस्ट शेअर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर सोशल मिडियाद्वारे अतिशय खालच्या भाषेत निंदाजनक टीका केली आहे. या पोस्ट मध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आजाराबाबत व व्यंगाबाबत हिणविण्यात आले असून त्यांची निंदा आणि थट्टा करण्यात आली आहे. पवार साहेब हे जेष्ठ नागरिक असून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या आजाराबद्दल त्यांना हिणवणे अतिशय निषेधार्थ आणि गंभीर आहे. सदर पोस्टवर निखिल भामरे (बागलाणकर) याने “बारामतीच्या “गांधी” साठी नथुराम गोडसे तयार करण्याची वेळ आली आहे.” अशी हत्येला प्रवृत्त करणारी पोस्ट टाकली आहे.पवार साहेबांना जीवे मारण्याचा धमकीच दिली असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, या निंदाजनक पोस्ट व त्यावरील विविध प्रतिक्रियांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. केतकी चितळे हिच्या निंदाजनक पोस्टमुळे दोन समाजामध्ये तेढ व वाद निर्माण होऊन दंगली सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.तसेच त्यांचा नथुराम गोडसे करणे म्हणजे त्यांचा खून करण्याबाबत अतिशय गंभीर आणि भडकावू वक्तव्य केले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता वरील सर्वांवर विविध कायदेशिर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.