नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटामुळे रेल्वे प्रवाशांना आरक्षित तिकीट सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे वेगळीच अडचण निर्माण झाली आहे. प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाने याची दखल घेत प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई-दिल्ली रेल्वेमध्ये लवकरच जनरल तिकिटावर प्रवास करता येणार आहे. एक्सप्रेसमध्ये आरक्षित जनरल बोगीतील प्रवाशांनी नापसंती दर्शविली आहे. या बोगींमध्ये फक्त ४० ते ५० टक्के प्रवासी प्रवास करत आहेत, असे दिसून आले आहे, त्यामुळे उत्तर-पूर्व रेल्वे विभागातर्फे अर्धा डझन रेल्वेच्या आरक्षित जनरल बोगी अनारक्षित बोगींमध्ये रूपांतरित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्थानिक मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी आणि कृषक एक्सप्रेसमध्ये सुद्धा आता जनरल तिकिटावर प्रवास करता येणार आहे. या निर्णयाने आरक्षण तिकिटापासून मुक्ताता होणार असून, प्रवाशांचे १५ ते ३० रुपये वाचणार आहेत.
लॉकडाउननंतर एक जून २०२० पासून सर्व विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत. स्पेशल एक्सप्रेसच्या जनरल बोगीत (टू एस) आरक्षित तिकीट अनिवार्य करण्यात आले होते. फक्त पॅसेंजर गाड्यांमध्ये जनरल तिकिटांची परवानगी देण्यात आली होती. पॅसेंजरनंतर विभागात धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये सुद्धा अनारक्षित बोगी लावण्याची तयारी सुरू केली आहे. लखनऊ विभागातील आठ एक्सप्रेसचा प्रस्ताव तयार करून गोरखपूरला पाठविण्यात आला आहे. प्रमुख मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांनी मंजुरी दिल्यानंतर कोरोना काळापूर्वी असलेली व्यवस्था पुन्हा लागू करण्यात येणार आहे. या व्यवस्थेमुळे सामान्य नागरिकांचा प्रवास स्वस्त होईलच शिवाय रेल्वेच्या महसुलातही वाढ होणार आहे.
एनईआरची व्यवस्था रुळावर
ईशान्य रेल्वे विभागाची परिस्थिती हळूहळू सुरळीत होत आहे. परंतु सामान्य प्रवाशांना एक्सप्रेस रेल्वेमध्ये जनरल बोगीचे आरक्षित तिकीट खरेदी करणे कठीण होत आहे. कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने दिल्ली आणि मुंबई नव्हे, तर स्थानिक प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता जनरल तिकिटावर प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर एका जनरल बोगीत १०० ऐवजी १५० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.