नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. यासोबतच त्यांनी त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस हा सुद्धा भाजपमध्ये विलीन केला आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, किरेन रिजिजू, भाजप नेते सुनील जाखड आणि भाजपच्या पंजाब प्रमुख अश्विनी शर्मा यांच्या उपस्थितीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माजी काँग्रेस सदस्य आणि पंजाब विधानसभेचे उपसभापती अजयबसिंग भाटी हे सुद्धा भाजपमध्ये दाखल झाले.
प्रवेशानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबमधील पाकिस्तानच्या धमकीवर भाष्य केले. ते म्हणाले की, चीनकडूनही आम्हाला सतत धोका आहे. काँग्रेसच्या राजवटीत संरक्षणमंत्री असलेले ए.के.अँटनी यांना त्यांनी सवाल केला. शस्त्र खरेदीच्या बाबतीत कोणतेही पाऊल उचलले नाही. भाजप देशाच्या रक्षणासाठी काम करत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा आभारी आहे. ते म्हणाले की, मला आशा आहे की शेजारील राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही अधिक चांगली भूमिका बजावू शकू. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, आमची विचारसरणी आहे की देश एकसंध असावा. पंजाबसारख्या संवेदनशील राज्याला खूप काळजी घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री असताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देशाच्या सुरक्षेपुढे राजकारणाला महत्त्व दिले नाही.
म्हणूनच आम्ही एकत्र आहोत
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे ते पंजाबमध्ये शांतता आणि सुरक्षिततेच्या बाजूने आहेत. त्यांच्या येण्याने भारतीय जनता पक्षाची ताकद वाढेल आणि पंजाबमधील विकासासाठी हे ऐतिहासिक पाऊल ठरेल. भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे ज्यामध्ये राष्ट्र प्रथम आणि पक्ष दुसरा असल्याचे नेहमीच अभिमानाने सांगितले जाते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हे तत्व आपल्या आयुष्यात नेहमी अंगिकारले. त्याचाच परिणाम म्हणजे आज आपण सगळे एकत्र आहोत.
Former Punjab CM Shri @capt_amarinder joins BJP at party headquarters in New Delhi. #JoinBJP https://t.co/UURLEy51Q2
— BJP (@BJP4India) September 19, 2022
Punjab EX CM Captain Amarinder Singh Join BJP
Politics Join