मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना अटक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता पुढे काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भास्कर जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जाधव यांच्याविरोधात आता पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पूर्व विदर्भातील शिंदे गटाच्या वतीने भास्कर जाधव यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसह गोंदियामध्ये पोलिस तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
१० ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा झाली. यावेळी भास्कर जाधव यांनी केलेल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर वक्तव्य करत त्यांनी टिंगल केली, असा आरोप करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या वतीने तक्रार दिल्यानंतर कलम २९४, १५३, ५०० आणि कलम ५०४ अन्वये गुन्हा दाखल करुन भास्कर जाधव यांच्या अटक करावी, अशी तक्रार गोंदिया पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. माननीय राष्ट्रपती आदिवासी समाजातून येतात. त्यामुळे आदिवासीबहूल गोंदियाच्या भावना तीव्र असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
राष्ट्रपतींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शिंदे गटाचे गोंदिया जिल्हाप्रमुख विंध शिवहरे यांच्या वतीने ही पोलीस तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीबाबत पोलिस काय दखल घेतात आणि भास्कर जाधव यांच्यावर काय कारवाई होते, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटाचे गोंदिया जिल्हाप्रमुख विंध शिवहरे यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच जाधव यांच्या वक्तव्यामुळे आदिवासी बांधवांचाही अपमान झाल्याचे ते म्हणाले. जाधव यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Politics Shivsena Dispute Leaders FIR Police Action