नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपने मिशन २०२४ ची तयारी जोरात सुरू केली असून हे काम अगदी केंद्रीय मंत्र्यांनाही देण्यात आले आहे. मात्र, केंद्रीय मंत्र्यांची गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली आहे. केंद्रीय मंत्री हे लोकसभा मतदारसंघांना भेट देत नसल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा मतदारसंघात जाऊन संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे टार्गेट या मंत्र्यांना देण्यात आले आहे.
लोकसभेच्या एकूण १४४ जागा निवडून आणण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली आहे. या जागांवर भाजपला यापूर्वी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता या सर्व जागा घेऊन २०२४ मध्ये ३५० चा आकडा पार करण्याची पक्षाची रणनीती आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत अमित शहा मंत्र्यांना म्हणाले की, ‘आम्ही केवळ संघटनेमुळे येथे आलो आहोत. संघटना आहे म्हणून हे सरकार आहे. संघटनेला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप लोकप्रिय आहेत. मोदींच्या नावावर कोणीही जिंकू शकतो. पण जर जमिनीवर संघटना नसेल तर त्याचा फायदा आपल्याला घेता येणार नाही. ‘गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. २०१४ मध्ये आम्ही गमावलेल्या ३० टक्के जागा २०१९ मध्ये जिंकल्या होत्या. आता आम्हाला २०२४ मध्ये ५० टक्के जागा जिंकायच्या आहेत ज्या २०१९ मध्ये गमावल्या होत्या.
भाजपने २०२४ मध्ये ३५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी पक्षाने २० महिने आधीच तयारी सुरू केली आहे. यावेळी भाजपने १४४ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यात त्यांना अल्प फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. या १४४ जागांपैकी किमान निम्म्या म्हणजे जवळपास ७० जागा काबीज करण्याची भाजपची रणनीती आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने एकट्याने ३०३ जागा जिंकल्या होत्या. गेल्या अनेक दशकांत एका पक्षाने स्वबळावर बहुमत मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.
गेल्या वेळी पराभूत झालेल्या १४४ जागांवर भाजपने केंद्रीय मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे. तसेच, तेथे विजयाचे लक्ष्य दिले आहे. या मंत्र्यांना कल्याणकारी योजनांच्या स्थितीची माहिती घेण्यास सांगण्यात आले आहे. सरल पोर्टलवर ही माहिती अपडेट करावी लागेल. मंत्र्यांना नेमून दिलेल्या भागात वारंवार भेटी देण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय त्यांना सरकार आणि संस्थेच्या कामाच्या वेळा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीत विजयाचा फॉर्म्युला देताना अमित शाह म्हणाले की, मजबूत संघटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा २०२४ मध्ये मोठा विजय मिळवू शकतो. कुठल्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी जबाबदारी दिलेल्या लोकसभा मतदारसंघात जावे आणि प्रभावी काम करावे, असे निर्देशही शहा यांनी दिले आहेत.
Politics BJP Amit Shah and J P Nadda Union Ministers
Mission 2024 Loksabha Election