इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एअर स्ट्राईकनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. हल्ल्याच्या घटनेनंतर पहिल्यांदाच ते जनतेशी बोलणार आहे. याअगोदर भरातीय सैन्य दलांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सीमारेषेवरील कारवायांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहलगाम हल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ६-७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आले. परंतु भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. भारताने ९ मे रोजी पाकिस्तानवर प्रत्युत्तर म्हणून हवाई हल्ला केला आणि १० मे रोजी जोरदार तोफगोळांचा माराही केला. भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांच्याशी संवाद साधला आणि पाकिस्तान चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. भारताने स्पष्टपणे सांगितले की ही चर्चा फक्त डीजीएमओंमध्येच होईल.
त्यानंतर १० मे रोजी दुपारी पाकिस्तानी डीजीएमओने भारतीय डीजीएमओशी बोलण्यासाठी वेळ मागितला. दुपारी साडेतीन वाजता भारत आणि पाकिस्तान डीजीएमओ यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत पाकिस्तानी डीजीएमओकडून शस्त्रसंधीची मागणी झाली. भारताचा उद्देश पूर्ण झाला असल्याने भारताने ती मान्य केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट करून भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीची माहिती दिली. या ट्विटनंतर लगेचच परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन देशाला शस्त्रबंदीची माहिती दिली. या सर्व घडामोडीनंतर पंतप्रधान मोदी आज जनतेशी काय संवाद साधता याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.