इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरात सध्या छत्तीसगडमधील एका घटनेची जोरदार चर्चा होत आहे. ती म्हणजे, एका अधिकाऱ्यामुळे किती मोठे नुकसान होते. आणि अखेर त्याची शिक्षाही त्याला होते. अधिकाऱ्याचा स्मार्टफोन तलावात पडल्याने अख्खा तलावच उपसून काढण्यात आला. लाखो लिटर पाणी वाया गेले.
फूड इन्स्पेक्टर राजेश विश्वास सोमवारी सुट्टीसाठी खेरकट्टा परळकोट जलाशयावर पोहोचले होते. तिथे त्यांचा महागडा आयफोन जलाशयात ओव्हरफ्लो होऊन वाहत्या पाण्यात पडला. त्यानंतर अधिकाऱ्याचा फोन शोधण्यासाठी पाणी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून ३० एचपीच्या पंपाने पाणी बाहेर काढण्यात आले आणि अखेर गुरुवारी सकाळी फोन पाण्याबाहेर काढण्यात आला.
छत्तीसगडमधील कांकेरमध्ये ही घटना घडली. मोबाईलसाठी तब्बल २१ लाख लिटर पाण्याची नासाडी करणाऱ्या अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांना जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी निलंबित केले आहे. सेल्फी काढताना फूड इन्स्पेक्टरचा मोबाईल जलाशयात पडला होता. यानंतर त्याला शोधण्यासाठी सर्व पाणी उपसण्यात आले. पाणी उपसा करण्यास परवानगी देणाऱ्या जलसंपदा विभागाच्या एसडीओंनाही प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कोयलीबेडा ब्लॉकचे फूड इन्स्पेक्टर राजेश विश्वास त्यांच्या मित्रांसोबत पंखजूरमधील परळकोट जलाशयाजवळ पार्टी साजरी करण्यासाठी गेले होते. सेल्फी घेताना त्यांचा महागडा फोन पाण्यात पडला. फोन परत मिळवण्यासाठी तब्बल तलावातील पाणी उपसण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम चार दिवस चालली. त्यासाठी प्रथम गोताखोरांची मदत घेण्यात आली. काम न झाल्याने ३० एचपीचा पंप बसवून २१ लाख लिटर पाणी जलाशयातून बाहेर काढण्यात आले. अखेर गुरुवारी त्यांचा मोबाईल सापडला. ऐन कडाक्याच्या उन्हात लाखो लीटर पाण्याचा हा अपव्यय सर्वांच्याच जिव्हारी लागला..
हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची खिल्ली उडवली. परळकोट जलाशयातील कचऱ्यातून ४१११०४ घनमीटर पाणी वाया घालवल्याप्रकरणी कांकेरच्या जिल्हाधिकारी डॉ. प्रियांका शुक्ला यांनी फूड इन्स्पेक्टरला निलंबित केले आहे. त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या एसडीओ यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. एसडीओकडून २४ तासांत उत्तर मागितले आहे. यासोबतच एसडीओवर कारवाई करण्यासाठी विभागाला पत्रही दिले आहे. अन्नमंत्री अमरजित भगत यांनीही आवश्यक ती कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
छंदिष्ट व्यक्ती
फूड इन्स्पेक्टर राजेश बिस्वास आपल्या महागड्या छंदामुळे चर्चेत राहिला आहे. यापूर्वी लाखोंची थार कार आणि दुचाकी ठेवल्यामुळे तो चर्चेत आला होता. आता या मोबाईलचीही किंमत ९६ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. २२ डिसेंबर २०१८ रोजी त्याची सरकारी खात्यात नियुक्ती झाली. त्यानंतर त्याची पोस्टिंग अंतागड, भानुप्रतापपूर, कोयालीबेडा आणि पखंजूर येथे झाली. कोळीबेडा येथे नियुक्ती झाली त्यावेळी तेथे तांदूळ घोटाळ्यामुळे एकदा त्याचे निलंबन झाले आहे.
https://twitter.com/ramanmann1974/status/1662034099630907393?s=20
Officer Mobile Lake Water Waste