इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या मेळाव्यात बोलताना मंत्री नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. जिल्हा नियोजन समितीच्या कामांवर स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर थेट इशारा दिला. यावेळी ते म्हणाले की, सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय. कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत.
नितेश राणे यांच्या या विधानावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद उमटले. यावेळी शिवसेना मंत्र्यांनी आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण? असा सवाल केला. त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकाराचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना दिला. तसेच कुणाचाही बाप काढणं योग्य नाही. संबधिक मंत्र्यांशी मी बोललो, ते म्हणाले माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, पण, मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात जो काही अर्थ असेल त्यापेक्षा परसेप्शन जातं ते राजकारणात महत्त्वाचं असतं अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
या अगोदर त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, नितेशने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलतांना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण, आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.
नितेश राणे ब-याच वेळा भडक वक्तव्य करतात. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील घटक पक्षाची कधी कधी अडचण होते. आज त्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले.